Saturday, December 31, 2011

नववर्षाच्या शुभेच्छा!

३१ डिसेंबर साजरा करण्याच्या माझ्या संकल्पना बदलायला लागल्या आहेत. पूर्वी ३१ डिसेंबरसाठी आठवडाभर आधीपासून तयारी चालू असायची. नवे कपडे, त्या दिवशी ज्या क्लबमध्ये पार्टीला जायचं असेल त्याचे पासेस, ग्रुपची जमवाजमव वगैरे गोष्टी मी आनंदाने करायचो. पण आता ते काहीच नको वाटतं. नाचणं, गर्दीला कसंतरी बाजुला सारत जाऊन काहीतरी अर्वाच्य खाणं-पिणं, ते काऊंटडाऊन आणि बरोबर १२ वाजता एकमेकांना मिठी मारून Happy New Year असं जोरात ओरडणं. पुन्हा पार्टी संपली की डीजे invariably सगळ्यांना Happy New Year wish करतो आणि पुढे म्हणतो Have safe sex. आता मला या सगळ्या गोष्टी हास्यास्पद वाटायला लागल्या आहेत.

३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशन्सचा माझ्या मते अर्थ आता फक्त एका 'सॉरी' आणि एका 'थॅंक्यू' पर्यंत मर्यादित होऊ लागला आहे. मागील वर्षी ज्या गोष्टी हातुन चुकीच्या झाल्या त्याबाबतीत सॉरी आणि या चुका सुधारण्यासाठी मला जे नवं वर्षं बहाल करण्यात आलं आहे त्या बाबतीत मनापासून थॅंक्यू.

अर्थात, माझा दृष्टीकोन याबाबतीत बदलला म्हणजे आजही जी माणसं नाचतात, दारू पितात ती वाईट आहेत असा मुळीच नाही. या सार्‍या गोष्टी शेवटी आयुष्यातील सौंदर्यशोधनाचे प्रयत्न आहेत आणि सौंदर्य कुणाला कशात दिसेल हे आपण कसं ठरवणार? मला भावणार्‍या सौंदर्याचा शोध मात्र मला लागला आहे इतकाच त्याचा अर्थ!

सार्‍यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा,
केदार

Thursday, December 22, 2011

माणुसपण देगा देवा, नाही देवत्वाचा हेवा!

काही माणसं अध्यात्माच्या नावाखाली मनात भयगंड बाळगून वावरत असतात ते पाहून मी सुन्न होतो. सुन्न अशासाठी की मी ही त्याच संस्कृतीतला. पण आताशा माझे विचार थोडेसे सत्याच्या जवळ यायला लागले आहेत. देवाला हे आवडतं, ते आवडत नाही. हे चुकीचं झालं की देव रागावतो. देवाला योग्य वेळेला नैवेद्य दाखवला नाही तर देव पाप करतो. देवाला काय, बाकीचे धंदे नाहीत? त्यानी आपल्याला फक्त आपण केलेल्या चुकींच्या शिक्षा करण्यासाठी जन्माला घातले आहे काय? बापरे... अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आत्ता घोळत आहेत. त्यांची उत्तरं फक्त माझी मलाच माहीत. दुसर्‍यांना त्यांचं ना सोयर ना सुतक. त्यांना ज्या गोष्टी करण्याची सवय झाली आहे ते त्या गोष्टी करणारंच. करा की... पण दुसर्‍यांना का तुमच्या देवाबद्दलच्या गलिच्छ संकल्पनांनी विणलेल्या जाळ्यात ओढता?

देव म्हणजे काय याचं उत्तर मोठमोठे गणिती, शास्त्रज्ञ अजून देऊ शकले नाहीत. याचा अर्थ देव नाही असा काढायचा का? छे छे... माझ्या मते देव आहे... नक्की आहे... पण तो दयाळु आहे... कनवाळु आहे... एखादा मनुष्य २० किलोमीटर प्रवास करून भुकेला आपल्या दर्शनाला किंवा पुजनाला आला आहे, मग भले तो येतांना दोन फुलं कमी का घेऊन येईनात, त्याचा चेहरा उतरलेला का असेनात, त्याची दाढी वाढलेली का असेनात... तो माझा आहे असाच विचार देवाच्या मनात येत असावा. पण अध्यात्माचं थोतांडं माजवणारे काय काहीही बोलतात. त्याचा विचार मी कुठपर्यंत करावा? मनात भिती असावीच पण भयगंड नसावा हे नक्की. भिती आपल्याला चुकीचं पाऊल उचलण्यापासून परावृत्त करेल पण भयगंड आपल्याला पाऊलंच उचलु देणार नाही, मग आपल्या मनुष्यपणाचं काय करायचं? माणसाचा गुणधर्म चुका करणं, त्यातून शिकणं. हा गुणधर्म जर देवानीच माणसात घातला असेल तर तोच देव हातून चुकुन झालेल्या चुकांसाठी माणसाला शिक्षा करेल ह्यावर माझा तरी नाही बुवा विश्वास बसत.

देव निळ्याशार आकाशासारखा निरामय असेल, भरून आलेल्या काळ्या आभाळासारखा गुरगुरत अंगावर येईल असं मला तरी वाटत नाही. देव पाण्याच्या संततधार नैसर्गिक प्रपातासारखा एकसंध आणि शुद्ध असेल, तो साठुन राहिलेल्या डबक्यासारखा कळकट्ट आणि संकुचित नक्कीच नसेल. देव समईच्या ज्योतीप्रमाणे शीतल असेल, तो भसाभ्भस तेज अंगावर फेकून आपलं देवपण सिद्ध करणारा असेल असं मला वाटत नाही. आपलं बाळ आपल्यापाशी आलंय, ते थकलंय, त्याच्या हातून आपल्यासाठी होत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याबद्द्ल त्याला खरी आत्मीयता आहे म्हणून होत आहे हे देवाला कळत नसेल? कोण आई दमून आलेल्या मुलाला किंवा मुलीला पाय चेपण्यासाठी तासनतास राबवून घेईल? माझ्या तरी पहाण्यात अशी आई आजवर आलेली नाही. मग 'माऊली' असं बेंबीच्या देठापासून केकाटायचं आणि त्याच 'माऊली'ला घाबरून बिचकुन रहायचं यात कितपत तथ्य आहे? बहूतेक अशी माणसं अर्धवट तरी असतात किंवा अतिशहाणी तरी यावर माझा ठाम विश्वास बसत चालला आहे. संताघरचं अन्न मिळणार म्हणून ही माणसं काहीही करतील, पण अंगात खरखुर संतंपण भिनावं यासाठी ही माणसं काय विशेष करतात? अरे बेट्यांनो, प्रसाद खाऊनच जर सुख मिळणार असेल तर मग प्रसादासाठी दर दिवशी रांगेत उभे रहाणारे भिकारी आज एकावेळच्या अन्नापासून वंचित का रहातात? हा साला सगळा स्वार्थ आहे. यात शुद्ध भावना किती आणि वासना किती हे त्यांचं त्यांनाच माहीत. आणि अगदी खरी भावना असली तरीही जोवर देवाधर्माच्या या बाजारात त्यांच्यासारख्यांनी निर्माण केलेल्या दिखाऊ संकल्पना आहेत तोवर देवाबद्द्लचा भयगंड माणसाच्या मनात तसाच राहील आणि कालांतराने तिथे अंधश्रद्धा तरी निर्माण होईल किंवा अनास्था तरी!

माणसातलं माणुसपण मेलं की त्याच्यातला देवही मरतो असं मला वाटतं आणि म्हणुनच देव आपल्यासोबत असावा असं वाटत असेल तर माणुसपण जपणं हा इतकाच सोपा उपाय रामबाण आहे. बाकी हे झाले माझे विचार... थोडे जहाल असतीलही...पण ज्या देवाने मला निर्माण केलं त्याच्याविषयी आणि मला जसं निर्माण केलं त्याबाबतीत कृतज्ञ रहाण्याचं सोडून त्यानी माझ्यात ओतलेल्या जिवंत माणुसपणाशी प्रतारणा करण्याचा मुर्खपणा मी आजवर करत आलो. आता बास! अध्यात्मात उंचावर पोचणं यापेक्षाही उंची गाठणं जास्त महत्वाचं आणि उंची गाठायचीच असेल तर देवाधर्माबद्द्लचा डोळस दृष्टीकोन अंगिकारणं याला पर्याय नाही. शेवटी...

जेथे जातो तेथे तो माझा सांगाती ।
चालविलं हाती धरोनिया ।।

तुमचा(काहीसा उद्विग्न),
केदार

Monday, December 19, 2011

आज संध्याकाळी...


आज संध्याकाळी,
घुसमटलेपण असह्य झालं,
मनात पाचोळा पाचोळा झालेल्या स्मृतींशी,
एकांतात बोलण्यात बराच वेळ निघून गेला.
तरी त्यांचा चोथा झाला असं अजून म्हणवत नाही.

कारण ते घुसमटलेपण मला कुठेतरी हवयं.
तुझ्या आठवणींचं ते द्योतक आहे.
माझ्यातील उर्जेचा ते स्त्रोत आहे.

समोर सूर्य अस्ताला चाललाय.
आणि मी तुझ्यासोबत....

छे.... तु आहेस कुठे?
आहेत फक्त तुझ्या स्मृती... काळोखात नकळत विरणार्‍या...
घुसमटलेपण तीव्र करणार्‍या...

अन् तरीही....
तुझ्या आठवणींत रमण्यासारखी रमणीय संध्याकाळ नाही.

..
केदार

Friday, November 11, 2011

'शलाका'

Photo of Engagement Proposal Sunrise on the Beach

माझी मैत्रिण माझ्याशी आज सहज बोलत असता तिच्या डोळ्यात अचानक साठुन आलेलं पाणी मी पाहीलं. तशी ती फार जुनी मैत्रिण आहे असंही नाही. पण तरीही तिला तिच्या दु:खाचं कारण विचारण्याचं स्वातंत्र्य मी आपणहून घेतलं. तिने सुद्धा मला मोकळेपणाने तिच्या मनातलं सांगायला सुरूवात केली.

"७-८ वर्षं लग्नासाठी मुलं बघतेय रे, पण अजून लग्न ठरतं नाही. वय वाढत चाललंय. प्रत्येक गोष्टी त्या त्या वयात व्हायला हव्या. वयाची पस्तिशी झाली. बहूतेक माझ्या नशीबात लग्न दिसत नाहीये".

मी या अनपेक्षित प्रसंगामुळे थोडासा गांगरूनच गेलो, खोटं कशाला बोला? शलाका अगदी उदास होऊन गेली होती, क्षीण झाली होती. तिच्यात तेजाचा अंश शिल्लक राहिला असावा असं वाटत नव्हतं. या सार्‍या वर्षात तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता यात शंका नाही. स्वाभिमानासोबतच रंगवलेली स्वप्न पटापट उलटणार्‍या वर्षांसोबत फिकट होत चालली होती. थोडावेळ शांततेत गेला अन् थोड्या वेळाने ती शांतताही बोचू लागली. मला बोलल्यावाचून करमेना. मी हळूहळू बोलण्यास सुरूवात केली.

"शलाका, लग्न ठरत नाही हे तुझं दु:ख एकवेळ मी समजू शकतो पण त्यासाठी आयुष्य आनंदाने जगण्याचं टाळणं हे कितपत योग्य वाटतं तुला?"

"नाही रे, एकटी मुलगी लग्नाशिवाय राहिली की समाज मागे बोलतो"

"समाज.................." मी किंचाळणारच होतो. (: "आता माझी सटकेल" असंच म्हणावसं वाटायला लागलं मला... :)

"समाज... समाजाची चिंता करायला, समाजानी तुझं काय केलंय? तुझं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी झालं असतं तर याच समाजानी बालविवाह केला म्हणून नावं ठेवली असती हे कळतंय का तुला? आपली पाठ फिरल्यावर आपल्याविषयी गैर बोलणार्‍या समाजाबद्दल मला काहीही सोयर-सुतक नाही आणि या असल्या कृतघ्न समाजाचं आपण देणं लागतो हे मला अजिबात मान्य नाही. समाजाचा विचार समाजाभिमुख लोकांनी करावा. आपण कुणासाठी जगणं शक्य झालं नाही तर स्वत:साठी तरी जगावं. You are just answerable to yourself. स्वत:ला आरशात पहातांना प्रसन्न वाटलं की आरसा पण हसतो. आरशाला कशाला कारणं द्यायची नावं ठेवायला? आणि कारण द्यायचीच कशासाठी? काय कमी आहे तुझ्यात? दिसायला छान आहेस, सुशिक्षित आहेस, सुसंस्कृत आहेस, मोठा पगार आहे, हुद्दा आहे, स्वत:ची गाडी आहे, फ्लॅट आहे. याचा माझ्यामते अर्थ तु यशस्वी आहेस असा नाही पण समाजाच्या दृष्टीने नक्कीच आहेस."

मी धडाधड बोलून गेलो.

बर्‍याच वेळाने शलाका थोडीशी हसली.

मला थोडं बरं वाटलं. ती हसली म्हणूनही आणि माझ्या भाषणाने मला स्वत:लाच जरा सकारात्मक वाटायला लागलं.

"The best way to cheer yourself up is to cheer someone else up" हे किती खरं आहे हे पटलं. मी पुढे बोलायला सुरूवात केली.

"पण हाच समाज तुझ्या या चांगल्या गुणांचं कौतुक न करता, तुझा ज्यात काहीही दोष नाही त्या गोष्टींवर ताशेरे ओढतो हे तुला पटतं?"

"नाही"

"नाही ना, म्हणून म्हणतो या चार भिंतीत अडकून पडू नकोस. ही चौकट सरड्यासारखी रंग बदलते. हिचं रुपांतर एकदम coffin मध्ये कधी होईल कळणारही नाही. "

तिला थोडंसं कळलेलं दिसलं. तिने डोळे पुसले. मी सिगारेट लाईट केली आणि पुढे बोलायला लागलो.

"आता राहीला प्रश्न वयाचा. त्याचा बोलबाला कशासाठी? मला माझी तिशी माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापेक्षा जास्त बरी वाटते. एक प्रकारची clarity आलेली असते या वयात. काय करावं याचं उत्तर मिळतच असं नाही, पण काय करू नये हे नक्की कळतं. आपण आपलं आयुष्य मस्त जगायचं. आपल्या स्वत:साठी जगायचं. दुसर्‍यांसाठी काही करायचं असेल तर त्याची सुरूवातसुद्धा स्वत:पासून करावी लागते. आपल्यातले गुण ओळखायचे. काहीही होवो आपला स्वत:चा effectiveness कमी होऊ द्यायचा नाही. तुझं दु:ख वय वाढत चाललयं हे नाही आहे. तुझं दु:ख वाढत्या वयासोबत आपण काही worthwhile करत नाही आहोत हे आहे. मला सांग, तुझ्या आयुष्याचं ध्येय काय?"

"आनंदी होणं" ती पटकन म्हणाली.

"मग फक्त तुझं लग्न झालं की तु आनंदी होशील, एरवी नाही?"

"तसं नाही. अरे पण वय वाढत चाललंय"

"तु जे सांगतेयस ते पटतयं मला आणि तुझं लग्न सुद्धा होईल लवकरच, पण तोपर्यंत स्वत:ला उत्तम मानसिक, शारीरिक, आर्थिक स्थितीत टिकवून ठेवण्याचं काम कोणाचं, तुझंच ना? ज्यावेळेस तो क्षण येईल त्यावेळेस त्याचं स्वागत करायला तु धड नकोस? आणि आयुष्याचा आनंद तुझ्यामते जर तारुण्यात आहे तर मग मला एक सांग,

शुभ्र, नीटस कपडे घालून एक प्रसन्न व्यक्ती आपल्या समोर उभी आहे...
अंतर्बाह्य शांत...
तिच्या केसांमधील विरळ चंदेरी बटा तिच्या आजवरील अनुभवांचे कथन करताहेत....
तिच्या डोळ्यात एक आत्मविश्वासपूर्ण अन् मार्दव सुहास्य आहे....
शरीराचा व्यास सुसंगत आहे...
लक्ष्मीचं, कलेचं, साधनेचं तेज तिच्या चेहर्‍यावर झळकतंय, याला तारुण्य म्हणत नाहीत?"

तिचे डोळे चमकले. मी ते पाहिलं. हे सगळं बोलून मला स्वत:लाच खूप शांत वाटायला लागलं. बहूतेक माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरं माझी मलाच मिळाली होती.

मी अजून बराच वेळ बोलत राहीलो असतो पण इतकं बोलून मी थांबलो. ती सुद्धा आधी पेक्षा बरीच शांत झालेली दिसत होती. दिवस संपला. कार काढली आणि घराकडे निघालो. रस्त्यात नेहमीप्रमाणे शनिवारात थांबलो चहा सिगरेटसाठी. एरवी जाणवणारा आजुबाजुचा प्रचंड कोलाहल शांत झाल्यासारखा वाटत होता. आपणं परिस्थितीपेक्षा मोठे झालो की असं घडतं हे मी कुठेतरी ऐकलं होतं.

ही तिची शांतता टिकेल, न टिकेल. मी पुन्हा या विषयावर काही बोलू शकेन न शकेन, पण एक मात्र नक्की...माझ्या प्रत्येक वाढदिवसाला "मी वयात आलो" हे असं म्हणण्याइतका नितळ दृष्टीकोन आणि निखळ मानसिकता मला लाभावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वत:चं स्वत:बरोबर असलेलं नातं दृढ करणं.

कुसुमाग्रजांनी कुठेशी लिहून ठेवलयं...

निराशेचा जरी अंधार हा असे
'मी'पणाचे नाते प्रकाशाशी...

माझे प्रयत्न चालू आहेत...आज फक्त झरोक्यावरची धूळ साफ केली आहे. उद्याच्या सुर्यासोबत त्यातून एखादी 'शलाका' येईल आणि ही चौकट तेजानी झळाळून उठेल...

विश्वास आहे.... मला विश्वास आहे...

तुमचा,
केदार

Thursday, November 3, 2011

स्वत:ला माफ केलं पाहीजे

मी स्वत:ला जाणते अजाणतेपणी कोसत असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की वाईट वाटतं. एक प्रकारची निराशा आणि हरल्याची भावना येते. यातला काही भाग मी स्वत:कडून जरा जास्त अपेक्षा करतो म्हणून असेल का? एखादी गोष्ट मला वाटते तशीच घडावी यासाठी आटापिटा करूनही ती गोष्ट घडायची तशीच घडल्यानंतर काहीतरी राहून गेलं असं वाटून आपल्याकडे कमीपणा घेण्यात कितपत तथ्य आहे याचा विचार मी सध्या करतोय. अहोरात्र करतोय. मी सुद्धा एक माणूस आहे हा विचार मी फार पूर्वी कुठेतरी दूर टाकून दिलाय आणि perfection च्या वाटेवर चालण्याचा दुबळा प्रयत्न चालू केलाय. Perfection? कशात perfection हवंय मला? एखादी संस्था मग ती सामाजिक असो की लग्न संस्था असो, तिच्यात perfection असणं हा झाला आदर्शवाद, पण ते तसं कधीच नसू शकतं हे आताशा मला कळायला लागलंय.

दोन भांडी आपटणारंच पण त्यांना पोचा जात नाही हे पहाणं, जमू शकतं?
एकमेकांची उणी दुणी काढतांना एकमेकांच्या चांगल्या गुणांचही स्मरण ठेवणं, जमू शकतं?
दुसर्‍यातील चुका त्याला चुका वाटणार नाहीत पण सुधारणा तर होईल अशा प्रकारे सांगणं, शक्य असतं?

असतं हे सारं शक्य असतं...पण त्यासाठी योग्य तशी साथसुद्धा मिळावी लागते. संशयाने छिन्न झालेल्या मनाला आपण केलेली कुठलीच गोष्ट कशी पटेल? थोड्क्यात perfection सापेक्ष नसतं. ते एकतर असतं किंवा अजिबात नसतं. अन् हे ठाऊक असूनही पूर्ण पुरुष बनण्यासाठी मी चालविलेला व्यर्थ खटाटोप मला आता बोचू लागलेला आहे. त्यापेक्षा अपूर्णतेतली गोडी भावण्यासाठी काय करावं हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी करेन.

केदार

Friday, October 28, 2011

धुकं!

काल धुकं बराच वेळ उतरलंच नाही. मी सकाळी उठलो आणि ऑफीसला जाणार नाही ही मंगलवार्ता घरात सांगितली. क्षणात सगळीकडे आनंदी आनंद झाला. बायकोनी माझ्याकडे लाडाने, कौतुकाने पाहीलं आणि मी खिडकीत धुकं पहात उभा असतांना माझ्याजवळ येऊन काहीतरी बोलण्यास सुरूवात केली. कधीतरी आत इतका कोलाहल माजलेला असतो की त्यावेळेस कुणाचेही शब्द, मग ते अगदी साधेच असले तरी नकोसे वाटतात. तिचं मन दुखावू नये म्हणून मी ही काहीतरी बोलत होतो. ते फारसं सुसंगत नव्हतं हे माझ्या ध्यानात येत होतं. मग उगाचंच "अग, बघ जरा कशी छान हवा पडलीय, गरम-गरम पोहे करतेस?" असं काहीसं बोलून मी त्या संभाषणाला अर्धविराम दिला.

बहुतेक आजकाल माझ्याकडचे बोलण्याचे विषय संपत आलेत किंवा मी बोलायचा कंटाळा करायला लागलोय. "काय बोलू?" हा यक्ष प्रश्न माझ्यापुढे आ वासून उभा रहातो. बोलण्यासारखं काही नाही. आवडीचं करण्यासारखं बरचं आहे पण वेळ नाही. खूप कंटाळा आलाय. जीव घुसमटतोय. काहीतरी करायचंय असं मनाला वाटतंय पण हातून घडत नाही. जे हातून एक दिवस घडतं ते दुसर्‍या दिवशी टिकत नाही. स्वप्न पूर्ण कशी करायची याचा विचार मनाला अस्वस्थ करतोय. मध्येच वाटत की निघून जावं परदेशात कायमस्वरूपी परत या सगळ्यापासून दूर, पण ते धारिष्ट्य होत नाही. कुठेतरी चार दिवस सुट्टीवर जावं असं वाटलं तर पैसे वायफळ खर्च होतील हा विचार. या अशा हल्लकल्लोळात जर कोणी माझ्यासमोर येउन उभं ठाकलं आणि म्हणालं "बोल", तरं काय बोलणार? डोंबल? आजकाल माझी अशी बर्‍याच वेळा गोची होते. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून सोडून द्यायचं अजून काय?

पोहे खाऊन झाल्यावर कॉफी केली. एक कप बायकोला दिला आणि म्हटलं "अगं आज जेवायला उगाच काहीतरी जास्त गोंधळाचं करू नकोस. बाहेर जाऊयात जेवायला." एका हॉटेलात जेवून आलो. वामकुक्षी घ्यायची म्हणुन पहूडलो आणि झोपायचा प्रयत्न केला. पण झोप येईना. मनात पुन्हा विचारांचं वादळ चालू झालं. दुपार अस्वस्थच गेली. आळसावून टीवी पहात बसलो ते संध्याकाळच्या ७ पर्यंत. मग हीची चुळबुळ पुन्हा चालू झाली. आता बहूधा अपेक्षा असेल कुठेतरी बाहेर फिरायला जावं अशी! तथास्तु! लक्ष्मी रोडवर फिरून आलो आणि येता-येता हिला एक मोगर्‍याचा गजरा घेऊन दिला. घरी आलो तेव्हा रात्रीचे १०:३० वाजले होते. डोळे मिटायला लागले होते. झोपण्याआधी काहीतरी तरी करावं म्हणून जाऊन एकटाच गॅलरीत उभा राहीलो, सिगारेट पेटवली आणि थंडपणे विचारात गढून गेलो.

कुणालाही आनंद देण्यात समाधान आहेच पण त्या समाधानाची खाती उघडत दरिद्री बॅंकर होऊन किती दिवस बसायचं? कॅशिअरच्या हाताला दर दिवशी लाखो रुपयांच्या नोटांचा स्पर्श होत असेल, पण त्या नोटा त्याच्या स्वत्:च्या खात्यात पडणार नाहीत किंबहूना तो तसं करू शकत नाही यातील कर्तव्याचा आनंद जास्त मोठा की त्याला महिनाअखेरी ज्या तुटपुंज्या पगारावर समाधान मानावं लागणार आहे त्यातून उमटणार्‍या जळजळीत वास्तवाच दु:ख मोठं? घरातून बाहेर पडतांना साध्या पोषाखात बाहेर पडून, कुठल्यातरी अज्ञात जागी कुणीही पहात नसतांना, स्पायडरमॅनचा वेष करून जगात वावरलं किंवा बाहेर साध्या पोषाखात वावरल्यानंतर घरी परततांना स्पायडरमॅनचा वेष करून घरात आलं तरी सरते शेवटी माझ्या वाटणीची एक बनियान आणि नाडी नसलेला बर्मुडा माझी कवचं-कुंडल बनली आहेत ही वास्तवता जीवाची कालवा-कालव करणारी का ठरू नये? हीच मनाची अस्वस्थता एक दिवस प्रज्वलीत होऊन माझा मार्ग मला दिसू लागेल या विश्वासावर मी भिस्त ठेवून आहे.

कोणताही मनुष्य शेवटी त्याच्या कुटुंबासाठी झटतच असतो. आपल्या माणसांच्या चेहर्‍यावरील समाधान पहाण्यात जो आनंद आहे त्याची सर अजून कुठल्या गोष्टीला सहसा येणार नाही. पण या सोबत स्वत:चं काहीतरी हवं. एक छोटासा कोपरा, स्वत:चा, सार्‍या बेगडीपणापासून, कोलाहलापासून दूर, अलिप्त असा एक कोपरा. चाळीशीला मागे वळून पाहिल्यानंतर "आपण काय मिळवलं" याचं उत्तर स्वत:ला देतांना

"दोन मुलं आहेत माझी, मोठा वर्गात पहिला आला बरं का...धाकटी कथ्थक शिकते" केवळ हे असं काही सांगण्याची मला तरी लाज वाटेल. आमच्या बागेतल्या मांजराला सुद्धा ४ पिल्लं झाली हो! ऋतू आला की प्राणीसुद्धा हेच करतात. मग मी त्यांच्यापासून वेगळा कसा होऊ शकेन हा विचार आला की सारं थबकतं. आपली राहून गेलेली स्वप्न मुलांमध्ये पहायची, त्यांना ती पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं, सहकार्य करायचं. का? त्यांना त्यांची स्वत:ची स्वप्न नाहीत?

"बाबा रे, तू स्वत:साठी काय मिळवलंस? किती तुझी राहून गेलेली स्वप्न जगलास?" या प्रश्नाचं उत्तर देतांना आपण किती पोकळ आणि उथळ जगलो याची जाणीव मला होवू नये....बस...हे इतकंच मनापासून वाटतं.

अपेक्षापूर्ती पण ती स्वत:ची नाही दुसर्‍यांची हे माझ्या आयुष्याचं ब्रीद बनून गेलयं. ऑफीसमध्ये साहेबाची, घरात आपल्या माणसांची, ज्यांना आपल्या आनंदाचं, दु:खाचं फारसं सोयर-सुतक नसतं अशा काही सोयर्‍यांची, परक्यांची, शेजार्‍यांची. आपण जन्माला येतो तोच मुळी अपेक्षापूर्तीचा शाप घेऊन. मग या अपेक्षा रास्त आणि डोळस असाव्यात याचा प्रयत्न फारसा का केला जात नाही? का?

"चला, आज हा घरी आहे" म्हणुन आमच्यासाठी काहीतरी करेल ही त्यांची अपेक्षा महत्वाची की "चला, मी आज घरी आहे", हा एक दिवस स्वत:च्या मनाप्रमाणे खमंग जगीन ही भावना जास्त महत्वाची? ही सुद्धा एक अपेक्षाच माझी, दुसर्‍यांकडून केलेली. पण "तुझं मन भरल्यावर जो वेळ मिळेल तो माझा" हा विचार मला "माझं मन भरल्यावर जो वेळं मिळेल तो तुझा" ह्यापेक्षा कितीतरी श्रेयस्कर वाटतो आणि तोच मी जास्त मानतो. याचे परिणाम चकीत करून सोडणारे असतात हा माझा अनुभव आहे. बहुतेक वेळा आपली सामंजस्याची भूमिका दुसर्‍यामध्ये कर्तव्याची जाणीव आपोआप निर्माण करते. अशा व्यक्तीच्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट स्वाभाविक असते. अशा वेळेस ती गोष्ट करणार्‍या व्यक्तीच्या कृतीमध्ये कर्तव्यपूर्तीचा दर्प नसतो आणि ज्याच्यासाठी ती केली जाते त्याच्या मनात उपकृत झाल्याची भावनाही!

गुलाबी थंडीत करण्यासारख्या गोष्टी बर्‍याच असतात. अंगावर गुबगुबीत पांघरूण घेऊन आवडतं पुस्तक वाचत पडून राहीलोय. त्यातल्या एका वाक्याशी मनातल्या भावना एकरूप झाल्याने, डोळे भरून येतांना होणार्‍या आनंदाचा साक्षात्कार अनुभवतोय. पूरिया-धनाश्री हवेत दरवळतोय. बाहेरचा पाऊस वाढत चाललाय. हातात पॉपकॉर्नचा डबा घेऊन The Shawshank Redemption सारखा एखादा ह्रदयाला हात घालणारा आणि दर वेळी तितकीच अनामिक स्फुर्ती आणि विश्वास जागविणारा चित्रपट बघितलाय. त्यामुळे Life is beautiful ही संकल्पना मनात पुनर्निर्माण होतेय, दृढ होतेय. संध्याकाळी गार हवेवर छान फिरायला गेलोय. एकमेकांच्या सहवासाचा आनंद मूकपणानी, स्पर्षातून घेतलाय. मनसोक्त पाऊस पिऊन मत्त पण अनासक्त झालेल्या प्राजक्ताचा सडा कुठेशी जमिनीवर पडलाय आणि कुठेतरी वेलीला लगडलेली तृप्त मोगर्‍याची फुलं त्यांच्या इवल्याश्या ओंजळीतून सुगंधाची लयलूट करत आहेत. एक सुंदर, निवांत दिवस झोळीत टाकल्याबद्दल मनात कुटुंबियांबद्दल आणि देवाबद्दल कृतद्यता आणि आदर भरून राहीलाय. आनंदाची व्याख्या कधी कधी अशी ही होऊ शकेल?

अचानक हाताला चटका बसला आणि भानावर आलो. सिगारेट संपली होती. दिवस संपला होता. दोघांचीही राख झाली होती. संध्याकाळी विकत घेतलेला मोगर्‍याचा गजरा सुकून गेला होता आणि बायको शांतपणे झोपून गेली होती. बेडरूममधला मिणमिणता दिवा मला खुणावत होता आणि बाहेरचं धुकं आणखीनंच गडद होत होतं.

तुमचा,
केदार

Wednesday, October 26, 2011

दिवाळी म्हणजे...



दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव!
दिवाळी म्हणजे चैतन्य!
दिवाळी म्हणजे आनंद!
दिवाळी म्हणजे आरास!
दिवाळी म्हणजे दारापुढील रंगीत रांगोळी!
दिवाळी म्हणजे दिव्यांची माळ!
दिवाळी म्हणजे आकाशकंदील!
दिवाळी म्हणजे अभ्यंग स्नान!
दिवाळी म्हणजे नवे कपडे!
दिवाळी म्हणजे फटाके!
दिवाळी म्हणजे स्नेहभोजन!
दिवाळी म्हणजे फराळ!
दिवाळी म्हणजे...
दिवाळी म्हणजे नरकासूराचा कृष्णाने वध केला तो क्षण!
दिवाळी म्हणजे अंधार उजळून टाकणारा तेज:कण!
दिवाळी म्हणजे प्रकाशसण! दिवाळी म्हणजे प्रकाशसण!

सार्‍यांना या प्रकाशसणाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

ही दिवाळी तुम्हा-आम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्याची, सुखाची, समाधानाची, शांतीची, समृध्दीची, भरभराटीची जावो!
स्नेह आहेच...तो वृध्दींगत होवो!

तुमचा,
केदार

Wednesday, October 19, 2011

घुसमट किंवा तत्सम काहीतरी...

कूपमंडुक वृत्तीची माणसं पाहीली की माझी घुसमट होते. अजूनपर्यंत माझ्याही हातून काहीच विशेष घडलेलं नाही याची प्रचंड खंत माझ्या मनात ठाण मांडून बसलेली आहे. त्यामुळे मीही अशा माणसांच्या पंक्तीत सहज बसतो हे कबूल करण्यात मला काहीच वावगं अथवा गैर वाटत नाही. पण त्यांच्या पंक्तीत मी बसलो तरी अजूनही अशा माणसांमध्ये मी उठून दिसत नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाजू. पंक्तीत मोक्याची जागा पटकावण्यासाठी अशा माणसांमध्ये प्रचंड चढाओढ चालू असते. तशी इच्छाही मला होत नाही अन् ही घुसमटच मला त्यांच्यापासून वेगळं काढण्याचा प्रयत्न करते.

नोकरी आहे म्हणून करायची. संसार आहे म्हणून करायचा. मुलं आहेत म्हणून वाढवायची. आयुष्यात तडजोड आहे म्हणून ती ही करायची. कितीतरी वेळा मनाविरुद्ध गोष्टी झाल्या तरी त्या मूकपणानी पहायच्या आणि त्यांचं खापर नशीबावर फोडायचं हे सारं कसं जमणार? सकाळी पिसाटासारखं घरातून निघायचं आणि संध्याकाळच्या वेळेस थकून भागून घरी परतायचं हा आमचा ठराविक कार्यक्रम. यात कुठेच काहीच कमी नाही? कधीतरी मला वाटतं की प्रोग्राम केलेल्या रोबोटसारखा मी या अशा माणसांसोबत संवेदनाहीन होत चाललोय. पण हेही सत्य की अशी माणसं आहेत म्हणून हे जग चाललय. सगळेच Steve Jobs, Vijay Mallya कसे होणार? पण म्हणून कोणी होणारच नाही हा निराशावादी विचार मला नको वाटतो.

मी जिच्यात मजूर आहे त्या कंपनीचं स्वप्न पुढील ३ वर्षात १००० कोटींचा revenue attain करायचं आहे ना मग त्याच्यासाठी तहानभूक विसरून कामाला लागायचं. Full dedication... hardwork... आणि मग हे स्वप्न पूर्ण झाल्यावर एक महागडं टायटनचं घड्याळ बक्षीस म्हणून घ्यायचं. मोठ्या समारंभात... सगळ्या लोकांसमोर....

छे.... आता तर मला हे असं काही घेण्याची सुद्धा लाज वाटते. त्या घड्याळ्याकडे एकदा नजर गेली की मी आयुष्यातल्या किती सोनेरी क्षणांचा बळी दिलाय हे संवेदनाक्षम आणि तर्कसंगत माणसाला आठवल्याशिवाय राहील का? एखाद्या वेळेस स्वत:ची राहून गेलेली एखादी अगदी छोटी इच्छा पूर्ण करण्यासाठी निवांत वेळ हवा असेल....एखाद्या वेळेस मुल आशेनी बापाकडे पहात असेल त्याला बागेत नेण्यासाठी... एखाद्या वेळेस आई वडीलांना एका आधाराच्या बाहूची गरज असेल... कपाळावर आलेली एक बट कानामागे सारण्यासाठी कुणी पत्नी क्षणभराच्या स्पर्षासाठी आसुसलेली असेल याचा विचार कोण करणार?

छे... मला वेळच नाही स्वत:ची स्वप्न जगायला. स्वत:चं काही घडवायला. मी दुसर्‍यांची स्वप्न जगण्यात मस्त आहे. दिवसेंदिवस परधार्जिणा होत चाललोय.

"Thank you for your dedication and outstanding efforts" असं काहीसं छापलेली सर्टिफिकेटस् माझ्याकडेही आहेत. शोकेसची शोभा वाढवण्यापलिकडे त्याचा काय उपयोग? किती वेळा ते सर्टीफिकेट पाहील्यावर मनात पुन्हा पुन्हा शिरशिरी येते? आपण काहीतरी करून दाखवलं असं वाटतं? आणि मग एक प्रश्न उभा राहतो.... खरंच आपण काय करून दाखवलं? केदार, You are not made to live this small हे कितीतरी वेळा वाटून जातं.

छे... काहीतरी केलं पाहीजे... वेगळं.. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वत:साठी काहीतरी केलं पाहीजे... स्वत:चं काहीतरी हवंच.... कुणालाही काहीही सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप नाही पण आपण जन्माला का आलो याचं उत्तर तरी मला आता हवंय. Knowing that, has started to become my biggest obligation.

आयुष्याच्या संध्याकाळी हा घालवलेला सारा वेळ आणि वाया घालवलेली स्वप्न क्षीण डोळ्यांनी पहायची फक्त एका आनंदात की मी चिक्कार दलाली गोळा केली माझ्या कुटुंबासाठी दुसर्‍यांची स्वप्न जगून. कंपनीची किंमत १००० कोटी झाली आणि माझ्या अमोल आयुष्याची आणि स्वप्नांची किंमत झाली काही लाख.

Have I not been downgrading myself all this time?
Deep down somewhere I know...
Its not about the price that I paid. Its about the real worth.

आणि मग दूर मावळणार्‍या सूर्याकडे पहातांना एकाच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा....

"Was it all worth it?"

तुमचा (पराकोटीचा अस्वस्थ),

केदार


Friday, October 7, 2011

कोसला

भालचंद्र नेमाड्यांची 'कोसला' हा एक अंगावर येणारा अन् चिरस्मरणीय अनुभव आहे. ही कादंबरी मी फार पूर्वीच वाचली होती पण आज त्याच्यातील 'मनीचा मृत्यू' या कथानकाचा काही भाग सहज डोळ्यांपुढे आला. पु.लं.नी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मृत्यूचे इतके नितळ दर्शन यापूर्वी खरंच कधीही पाहीले नव्हते. पुन:प्रत्ययाचा आनंद इतका असीम आणि टोकाचा असू शकतो हे 'मनीचा मृत्यू' पाहिल्यानंतर (मी "वाचल्यानंतर" असे म्हणणार नाही) जाणवलं. त्याचाच भाग तुमच्यासाठी खाली देत आहे.

केदार केसकर

ती अतिशय शांत होती. कामात, बोलण्याचालण्यात, गाणं म्हणण्यात, शाळेत जाण्यात.


आई म्हणायची, हिला मेंदूच नाही. कंदिलाची काच मोरीत दुसरं कुणीही घासत असतांना फुटली की आई म्हणायची, मन्ये, थांब कारटे. मग मनी घरातून म्हणायची, मी नाही ग आई. मी झाडते आहे. कुणी दुधाचं भांडं आडवं केलं की आई घरातून म्हणायची, मनीच असणार.


दर वेळी मुलगीच होते, म्हणून आजी नेमकी मनीच्या वेळी बाळंतपणाला कंटाळली. घरातले सगळे व्याप सांभाळून पुन्हा आईचं करायचं. ती तान्ह्या मनीचं अंग घसघसून घासायची. एकदा कडक पाण्यात थंड पाणी मिसळायचं विसरूनच तिला पायांवर पालथं घेऊन पाण्याचा चटका लागल्यावर आजी म्हणाली, आता कोण हिला परत पाळण्यात टाकेल, गार पाणी मिसळून पुन्हा घरातून हिला आणून पायावर घेईल? मग मनी किंकाळून रडली, तेव्हा आई घरातून आली. आणि पाण्यात हात घातल्यावर रडून म्हणाली, उठा मी धुते. तेव्हा आजी मनीला जमिनीवर आपटून म्हणाली, मुलींच्या आईनं एवढी मिजास करू नये.


पण आईचंसुद्धा मनीवर फार प्रेम नव्हतं. ती पोटांत असताना आईला पण वाटायचं, इजा बिजा तिजा. हा तिसरा मुलगाच होईल. पण झाली मनी. म्हणून वडलांचीसुद्धा हिच्यावर तिरपी नजर होती.

...

मनीच्या अंगावरचे फोड लिंबाएवढे झाले. आजी हिसपिस करत तिची व्यवस्था पाह्यची. आई छोट्या नलीकरता मनीच्या फार जवळ जायची नाही. दुरून पाह्यची. मनी आईला पाहून, मला घे म्हणून दोन्ही हात वर करायची. पण आई घ्यायची नाही.

फोड टरारले तेव्हा मात्र आई मनीच्या खाटेजवळ फक्त बसायला लागली. घराच्या कुणालाच तिथे येऊ देत नव्हते. फोड खाजवू नये म्हणून मनीच्या दोन्ही हातांत लहानलहान लांब पिशव्या अडकवून त्या मनगटांवर गच्च बांधून टाकल्या होत्या. पिशव्यांतून देखील ती फोड खाजवून फोडायची. म्हणून तिचे दोन्ही खांदे रक्तबंबाळ झाले होते. मग आजीने संतापून तिचे हात खाटेच्या दोन्ही बाजूंना करकचून बांधून ठेवले.

मग ती हात सोडा म्हणाली.
तेव्हा आईनं एकदा विचारलं, मनूताई, तुला काय हवं? पाणी?
तेव्हा मनी बोललीच नाही.
आई म्हणाली, मने बोल, बोल. उद्या तुला बोलता येणार नाही. आज माझ्याशी बोल.
पण ती आईशी बोललीच नाही.
आजी म्हणाली, मनूताई, दादाला तिकडून काय आणायला सांगू?
तेव्हा ती म्हणाली, लाल साडी.
लाल साडी.
हे ती म्हणाली, तेव्हा नेमकं त्या वेळी मी इकडे काय करत असेन? खोलीत होतो की टेकडीवर? की मित्रांबरोबर हसत होतो,की खिडकीतून टेकडीकडे पहात होतो?
तिला मी आठवलो असेन. लाल साडी.
हे ती मला दर सुट्टीत सांगायची. आणि मी दर वेळी म्हणायचो, पुढच्या वेळी नक्की.

मग मी साडी आणणार म्हणून ती माझी किती तरी कामं करायची. माझी पाठ खाजवून दिली नाही की मी म्हणायचो, लाल साडी हवी ना?
हळूहळू तिचा आवाज बंद होत आला. घशात पण फोडफोड असतील. डोळ्यांत तर फोड पडून बाहुल्या पांढर्‍या झाल्याच होत्या.

आई म्हणाली, मनूताई तुला काय हवंऽय?
मनी म्हणाली, माझे हात सोडा. आग, आग, आई, आग गं.
मग तिचं तोंडच उघडेना. तोंडात ओतलेलं आत जाईना. डोळे तर गेलेच होते.
आई खाटेच्या तिकडच्या बाजूनं हाक मारायची, मनूऽ
आणि ती दोन्ही हात ख्रिस्तासारखे बांधलेले ठेवून पांढरे डोळे ताणताणून नेमकी तिकडे पाह्यची.
मग आई उशामागून हाक मारायची, मनूताईऽ.
तेव्हा ती डोकं वर करून पाह्यची.
डोळे होते कवड्यांच्यासारखे शुभ्र.
आजी म्हणाली, अजून ऐकू येतंय.

आणि दोन दिवसांनी तिला न न्हाणता-धुता गावाबाहेर पुरून आले. आणि तिच्याबरोबर तिच्या खाटेला लागलेलं सगळं पुरून आले. तिची शाळेत जायची छोटी पिशवी, तिची चादर - सगळं.

मग दोन-तीन दिवस मी संतापून गेलो. पण कशावर संतापावं हे कळेना. कशावर?
मी म्हणालो, मी वडलांचा खून करीन. मी आजीला ठार मारीन. मग मी सगळं घर पेटवून देईन. सगळ्यांची प्रेतं त्या घरात जाळून टाकीन, आईला जिवंत. हे असं मरणं.
मनीला पुरलं पुरलं पुरलं. मी भावनांनी खरोखरच भडकून गेलो. बंडल नाही.
मी एक पिवळीजर्द लहान मुलींची साडी विकत आणली. आणि तिचे बोटबोट तुकडे केले. ते पेटवून दिले. त्या जाळात माझे हात भाजले. मग दौत जमिनीवर ओतून माझ्या हातांचे चटके थंड केले. शाईनं तळवे भिजवून भिजवून सगळीकडे माझ्या हातांचे शिक्के मारले. उशीवर, गादीवर, टेबलावर, वह्यांवर, पुस्तकांवर, दारावर, खिडक्यांवर, भिंतीवर.
मग पातेल्यातलं सगळं दूध खाली एका कुत्र्याच्या बेवारशी पिल्लाला पाजलं.
मी म्हणालो, मी याचा सूड उगवीन. दर महिन्याला शंभर रुपये खर्चीन. महिन्याला दोनशे रुपये मागवीन.
मी एकटा वेताळ टेकडीवर निघून आलो. केव्हा वेड्यासारखा धावत सुटलो. केव्हा नुसता बसून राहिलो. रात्री पुण्यातले अनेक रस्ते पायी हिंडलो. एका पोलिसानं हटकलं तेव्हा मी म्हणालो, माझी बहीण मेली.

...

आणि मी म्हणत होतो, धर्माचं होतं-नव्हतं तेवढं गाठोडं बांधून ती निघून गेली. निघण्यापूर्वीच्या वेदना आमच्या स्मरणासाठी ठेवून देऊन. तिनं एवढंच तोडलं नाही - जे तिच्याआमच्यात कायम राहील. बाकीचं सगळं - सगळ्या जमिनीवरच्या रेघा पुसून टाकल्या. ती नुकतीच नेमानं शाळेत जात होती. घरून सात वाजायच्या आतच तिला ढकलून द्यायचे. ती नुकतीच बाराखडी शिकली होती. आणि तिला फक्त शिकवलेलेच धडे वाचता यायचे. तेव्हा भिंतीवर तेवढीच अक्षरं तिला दिसली असतील. खिशात सागरगोट्या होत्या. फ्रॉकचं कापड अंगाला चिकटलं होतं. हे सगळंच टाकलं. ती सर्वत्यक्त काळोख्या लांब रात्रीची वाट चालत असेल आता. जेव्हा मीही त्या वाटेवर जाईन, तेव्हा ती किती तरी पुढे गेलेली असेल. म्हणजे सापडणारच नाही. गेलं ते गेलं, आता नवं काही - असं म्हणून. तिच्याबरोबरच तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली. आणि तिला हेही काहीच नाही. तिला कसलाच पार नाही. तीर नाही. किनारा आहे, जो फक्त एकदाच गाठता येईल. तिनं धर्म तरी काय बरोबर नेला असेल? तिनं येतांना फक्त कर्म आणलं. जातांना फक्त काळोखा प्रवास.
...

तिचा प्रवास तिचाच. ती सर्वमुक्त. हेमुक्त तेमुक्त. रंगमुक्त. अंगमुक्त. मनमुक्त. संज्ञामुक्त. ती मुक्तिमुक्त. तिचं पुसट मनोबिंब फक्त माझ्याजवळ.
...


कादंबरी - कोसला
लेखक - भालचंद्र नेमाडे

Thursday, July 7, 2011

आंबोली...स्वप्नातलं गावं!

आंबोली... स्वप्नातलं गावं! निसर्गाच्या सानिध्यात माणूस स्वत:ची दु:ख हरवून जातो हे हळूवार सांगणारं, डोंगराच्या कुशीतलं, एखादी सुंदर स्त्री श्वेत वसने लेऊन ओलेत्याने सामोरी यावी तसं शुभ्र धुक्यात भिजलेलं चिंब ओलं, बेहोश करणारं पण पावित्र्याची साद घालणारं, माणसाच्या विनाशक स्पर्शापासून अजून काहीसं दूर असलेलं हे खेडं! माझा आंबोलीला जाण्याचा योग अचानक आला. योग हा ठरवून येत नसतोच म्हणा. तो जमून येतो अथवा येत नाही. अचानक एक दिवस ठरलं, हॉटेलचं बूकींग मिळालं, आणि निघालो आम्ही आंबोलीला! पहाटे ५:३० ला घरातून निघालो.

जाता जाता आधी कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घ्यावं असं मनात योजलं होतं. सारी मदार महालक्ष्मीवरच! तिच्या मनात असेल तर दर्शन झाल्यावाचून रहायचं नाही. रस्त्यात आधी एका ठिकाणी थांबून ब्रेकफास्ट करायचं ठरलं. मग घरातून आणलेला ब्रेड बटर आणि गरम चहा पिऊन आम्ही पुढचा रस्ता धरला. पुढे नॉन स्टॉप कोल्हापूरपर्यंत गेलो. कोल्हापुरच्या कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर तिथे महालक्ष्मी मंदिराचा रस्ता विचारत विचारत आम्ही पुढे जात होतो. महाराष्ट्रात कोठेही १०० कि.मी. दूर गेल्यास भाषा बदलते हा प्रत्यय येत होता. त्या त्या ठिकाणची बोलीभाषा, बोलण्याची पद्धत, शब्दांचं टोनींग, शब्दकोष सारं वेगळचं. पण वेगळं म्हणूनच कानाला अतिशय गोड. माणूस बदलासाठी किती आसुसलेला असतो!

कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजे सौंदर्य आणि शक्ती यांचा अजोड मिलाफ! तिचं रूप, तिची शक्ती अवर्णनीय! त्या मंडपात गेल्यावरच काहीतरी दैवी भासायला लागतं. कोल्हापूरशी माझा तसा काही संबंध नाही. पण काही वर्षांपासून कोल्हापुरबाबत का कोणास ठाऊक जिव्हाळा वाटतो. रांगडेपणा भले ठायी ठायी भरलेला असेल पण दिलाचा सच्चेपणाही दिसतो यात शंका नाही. मंदिरात 'मुख्य'-दर्शनासाठी मोठी रांग होती म्हणून आम्ही 'मुख'-दर्शन करण्यासाठी वेगळ्या रांगेतून आत गेलो. दर्शन झालं यात सारं काही आलं. पण कोल्हापुरची कमान पार केल्यापासून एक अनामिक हुरहुर सदैव जाणवत होती. माणूस आठवणींचा गुलाम असतो आणि त्या मंदिराशीही माझं एक जुनं नातं आहे. तिथल्या काही जुन्या आठवणी फार अस्वस्थ करून गेल्या. तो मंडप, फुलांचे हार, वेण्या, नारळ, हळद-कुंकु, तांदूळ, खारवलेल्या कच्च्या कैर्‍या, त्या मागे असणारी ती एक शाळा... असो... एखादी जखम जितकी खोल तितकी चांगली... त्यामुळे इतर दु:ख काहीशी लोभसवाणी वाटू लागतात.

आणि मग तिथून आम्ही आंबोलीसाठी रवाना झालो. कोल्हापूरहून आंबोलीकडे जाण्याचा रस्ता म्हणजे एक चमत्कार आहे. लोण्यासारखा रस्ता बनविला आहे. डोळ्यांवर विश्वास बसत नाही. आपल्या देशाचे/राज्याचे सरकार इतके कार्यक्षम असू शकते? जर असू शकते तर मग बाबांनो पुण्यातले रस्ते बनवा की. का जाळता आम्हाला कणाकणानी आणि किमी-किमीनी?

आंबोलीला जाण्याचा मार्ग संकेश्वरवरून जातो. संकेश्वरपर्यंत रस्ता अफाट आहे. गजब वेगानी जाता येतं. संकेश्वरला आंबोली फाट्याला वळल्यानंतरही रस्ता उत्तमच आहे पण मग वेग थोडा मंदावतो. वळणं आहेत. मध्ये गावं आहेत. तिथून गाडी सांभाळून चालवलेली बरी. बरच अंतर पार केल्यावरती आम्ही गडहिंग्लजला पोहोचलो. दुपारी २ चा सुमार. भूक लागली होती. मग तिथल्या एका सामान्य हॉटेलमध्ये जेवून आम्ही पुढची वाट धरली. आंबोली जसं जसं जवळ येत चाललं तसा तसा हवेत गारठा जाणवू लागला. ढग खाली खाली येऊ लागले. दुपारी ३-४ ची वेळ असूनही धुकं दाट होतं. पाऊस पडत होता आणि अशा वेळेस आम्ही आंबोलीत शिरलो. प्रथम काही विशेष लक्षात येईना. रस्ते कळेनात. आम्ही रहाणार होतो ते ग्रीन वॅली रेसॉर्ट सुद्धा नीट कळेना अन तेवढ्यात मला हॉटेलचा साईनबोर्ड दिसला. आम्ही हॉटेलवर येऊन थडकलो. सामान काढलं, चेक इन केलं आणि पहिला चहा मागवला. थंडी होती, त्यात पावसात थोडसं भिजायला झालं होतं. गरम चहाचा पहिला ऊष्ण घोट आनंद देऊन गेला. सकाळपासून ड्रायविंग करत असल्यामुळे मी सुद्धा जरा पहूडलो पण झोप लागली नाही. बाहेर इतकं सुंदर वातावरण असतांना झोपायचं कसं? मन मनासी खायला लागलं. गरम पाण्यानी आंघोळ केली आणि खूर्ची टाकून गप्पा मारत हॉटेलच्या ऐसपैस पॅसेजमध्ये बसलो. आजूबाजूला किर्रर्र जंगल. वाहनांचे आवाज नाहीत, माणसांचा कोलाहल नाही. आवाज फक्त जंगलातील रातकिड्यांचे, बेडकांचे, टिटव्यांचे, काहीसे अपरिचित!

ग्रीन वॅली रेसॉर्ट

हळूहळू संध्याकाळ होत चालली. जंगलातील आवाज गडद होत गेले. धुकं गडद होत गेलं. समोरच्या हॉटेलमधील गॅलरीत टांगलेला केशरी कंदील धुक्याच्या आड गेला. आपलं क्षीण अस्तित्व दर्शवू लागला. जोराच्या वार्‍याबरोबर धुकं काहीसं फिस्कटलं की एक फिक्कट केशरी लकेर उमटे. पुन्हा सारं धुकंमय! थोड्या वेळाने आम्ही जेवणासाठी उठलो. आंबोली सिंधुदूर्ग जिल्ह्यात येतं. Authentic मालवणी खाण्यास मिळेलं या आशेने मी मालवणी चिकन मागविले. सुरमईचा एक तुकडा मागविला. पण जेवण खास नव्हतं. थोडी निराशा झाली. सोलकढी मात्र उत्तम होती. शतपावली करून आम्ही झोपण्यास रूमवर परत आलो. खरतर इतकं ड्रायविंग झाल्यामुळे झोप यायला हवी होती. पण थकवा कुठल्या कुठे दूर पळून गेला होता. बराच वेळ झोप लागली नाही. काही काळानी डोळे मिटले आणि जाग आली तेव्हा चहाचा घमघमाट रूममध्ये पसरत होता. मसाला चहा.... अहा.......


आंबोलीतील दुसरा दिवस. आज सावंतवाडीला जाण्याचा बेत होता. सावंतवाडी आंबोलीच्या पूर्वेस आहे. मध्ये घाट लागतो. आंबोली-सावंतवाडी म्हणजे ३०-३५ किमी. उतरंड आहे. घाट तसा अवघड आहे पण गाडी चांगली चालविणार्‍यास फार त्रास नाही व्हायचा. घाट अवघड आहे त्यामागे अजून कारणं म्हणजे दुहेरी वाहतुक, बर्‍याच ठिकाणी कठडे मोडलेले, दरड कोसळण्याचा धोका, पर्यटकांची गर्दी आणि धुकं. त्यातून वाट काढत जाणं म्हणजे थोडसं अवघड. आम्ही ९:३० ला सकाळी हॉटेलवरून निघालो. धुकं साधारण तसचं होतं. घाटाच्या सुरूवातीला धुकं दाट होतं ते नंतर जसा जसा घाट उतरू तसं तसं विरळ होत गेलं. संततधार चालूच होती. तो घाट म्हणजे डाव्या बाजूस उंच कपार आणि उजव्या बाजूस खोल दरी. दरीतून खालची गावं पत्त्यातल्या घरांसारखी दिसतात. पण सगळं हिरवंगार! जंगलच! कोकणी लोकांच्या म्हणण्यानुसार फॉरेष्ट! घाट फारच रमणीय. रस्ता मुळात चांगला आहे. फार खड्डे नाहीत. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यात दुतर्फा दाट झाडी. फणस, आंबे, नारळी, पोफळीची झाडं. छोट्या छोट्या वाड्या. हातात झावळ्या घेऊन खेचत चाललेली किंवा डोक्यावर फणस वागवत चाललेली कोकणी कष्टाळू माणसं. थोडं अजून खाली गेलं की दोन्ही बाजूंनी वस्त्या चालू होतात. लाल उतरत्या छपरांची कौलारू घरं, घरात ऐसपैस चौसोपी वर्‍हांडा, घरापुढे विहीर, एखादं गाय वासरू, तुळशी वृंदावन. हे मात्र खरं की सार्‍यांच्या घरासमोर हटकून तुळशी वृंदावन होतं. म्हणजे आपली संस्कृती अजून कुठेतरी जपली जातेय!

सावंतवाडी छोटसं गाव आहे. गावात मोती तलाव, राजवाडा वगैरे प्रेक्षणीय स्थळ आहेत. आम्ही तेथे पोचलो तेव्हा पाऊस पडत होता. मग मोती तलावाच्या बाजूस गाडी पार्क करून आम्ही मे. काणेकर यांच्या लाकडी खेळण्यांच्या दुकानात गेलो. माझ्या ५ वर्षांच्या भाच्याने मला एक लाकडी सायकल आणि घोडा आणण्यास सांगितला होता. तिथे थोडी खरेदी केल्यानंतर, आम्ही वरच्या चितार आळीत गेलो. तिथे काही अजून दुकान दिसली. तिथून अजून थोडीशी खरेदी करून आम्ही राजवाडा पहाण्यास गेलो. राजवाडा बाह्यदर्शनी चांगला आहे. अंतरंग कुणी पाहू दिलं नाही म्हणून काही अजून सांगू शकत नाही. तिथे गेलो तेव्हा एक माणूस टेबलावर पाय पसरून खुर्चीत निवांत झोपला होता. त्याला उठवल्यावर त्याने काहीशा नाराजीच्या सुरात आम्हाला राजवाडा बंद आहे असं संगितलं. अजून काही बोलण्याचा प्रश्न नव्हताच. तसेच मागे वळलो आणि राजवाड्यालगतच एक गल्ली जाते तीत शिरलो. तिथे ऐतिहासिक काही नव्हतं पण 'भूक' ही भौतिक गरज सतावू लागली होती. त्या गल्लीत 'साधले मेस' प्रसिद्ध आहे असं कळलं होतं. पूर्ण शाकाहारी आणि उत्तम प्रतीचे घरगुती ब्राम्हणी जेवण. पोळ्या, भाजी, आमटी, ताक, कोशिंबीर. साधच पण सुग्रास. ५० रु एक ताट. :) मला आमच्या पुण्यातलं बादशाही आठवलं. तिथे सुद्धा असचं छान जेवण पेशवाई थाटात मिळतं.

मोती तलाव

राजवाडा (सावंतवाडी)

सावंतवाडीत अजून करण्यासारखं काही नव्हतं. २ - २:३० वाजले असावेत. सावंतवाडीपासून काही अंतरावर रेडी गणपती आहे. तिथे जाण्याचं ठरलं. गणपतीची विशाल, देखणी मूर्ती आहे. मंदिराच्या मागील भागातून समोर समुद्र दिसतो. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. रेडी गणपतीला जाताना शक्य तेवढा सावधपणा बाळगलेला बरा. रस्ता सरळ नाही. दोन्ही बाजूंनी जंगल. गावं आहेत पण काही खास मदत मिळणार नाही. अत्यंत आत आत गेल्यावर हे मंदिर आहे. पुन्हा निसर्ग विशेष नाही. वाट्टेल तेव्हा पाऊस पडतो, रस्ता पूर्ण अंधारात बुडून जातो. का कोणास ठाऊक पण या रस्त्यावर फारसं बरं नाही वाटलं. एखादी वास्तू, ठिकाण, जागा, रस्ता असा असतो जिथे मनाला प्रसन्न वाटत नाही. त्यातलाच हा एक रस्ता. पुन्हा समुद्राचं दर्शन होऊनही मन आनंदी झालं नाही. समुद्र उसळलेला होता. त्या रूपात रौद्रता भासली. अगदी जाण्याचा निर्णय घेतलात तरी दिवसाउजेडी गेलेलं आणि परत आलेलं बरं.

पावसाचा रंग दिसायला लागला. वेळेत आंबोलीच्या दिशेने कूच केलेलं बरं अस मनात म्हणत होतो आणि ज्याची भिती होती तेच झालं. मी माझ्या आयुष्यात पाहीलेलं सगळ्यात दाट धुकं त्यादिवशी चराचरावर पसरलं. सारंच गायब. गाडीचे फॉग लॅंप्स लावूनही काही उपयोग नाही. २ फुटांवरलं काही दिसायला तयार नाही. मग घाटात एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. थोडी वाट पाहीली. पण धुकं कमी होइना. काहीसा अंधार जाणवायला लागला. आजुबाजुनी गर्द झाडी. तुरळक माणसं. आता मात्र मनात ठरवलं की आंबोलीला लवकरात लवकर पोचायचं. घाट चढून थोडा वर आलो आणि पाहीलं जवळ जवळ सार्‍यांचीच ही अवस्था आहे. गाड्या अत्यंत धीम्या गतीने चालत होत्या. समोरून येणार्‍या गाड्या थांबून शहानिशा करून पुढे सरकत होत्या. आता मी घाट चढत असल्याने दरीची बाजू माझी होती आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे बर्‍याच ठिकाणी कठडे तुटलेले आहेत. त्यात गाडी चालविणे म्हणजे दिव्य होतं. जरा गफलत झाली म्हणजे आम्हाला दरीचं जवळून दर्शन आणि देवाचही. गाडीच्या काचा बंद केल्या तर हॉर्न ऐकू येईनात, बाष्प जमायला सुरूवात. उघड्या ठेवायला माझी हरकत होती. का? कारण घाटमाथ्यावर माकडांची टोळकी निर्व्याज नाचत होती. त्यातलं एक माकड गाडीत घुसलं तर सारं कितीत पडेल? :) अन शेवटी एकदाची ती आंबोलीची कमान आली. मनात देवाचं स्मरण केलं आणि हॉटेल मध्ये पोचून मसाला चहा मागविला. त्या रात्री मी हॉटेलमध्ये चायनिज फूड मागविलं. सुरेख चायनिज फूड. आता याला काय म्हणायचं? ग्लोबलायझेशन की लोकलायझेशन?

तिसरा दिवस उजाडला सोनपावलांनी! धुकं गायब झालेलं होतं. उरला होता तलम सोनेरी सूर्यप्रकाश. काल रात्री भरपूर पाऊस पडून गेलेला. वातावरण थंड. त्यात कोवळी उन्हं. मस्त होतं यार! एकदम मस्त! अन्हिकं आटोपून बाहेर पडलो. आज आंबोलीतील स्थळं (लग्नाची नव्हे) पहाण्याचा बेत होता. हॉटेलमधील वर्कर भिकाजी मातोंडकर गाईड म्हणून सज्ज झाला. कोवळ्या उन्हात टोपी वगैरे चढवून थाटात आम्हाला बोलवायला आला. आम्ही तयार होतोच. मग आधी कुठे ब्रेकफास्ट करायचा हा प्रश्न? मला या प्रश्नांची कधी कधी तिडीक येते. साग्रसंगीत ब्रेकफास्ट केलाच पाहीजे का? कधी तरी नाही केला तर काय बिघडलं? रस्त्यात थांबून कुठेतरी वडापाव वगैरे घ्यायचा आणि गाडी चालू असतांना खायचा यात मजा आहे. वेळही वाचत नाही का? मग शेवटी लोकाग्रहास्तव आंबोलीत कामत रेस्तरॉं आहे तिथे गेलो. कडक डोसा आणि फिल्टर कॉफी छान होती. तिथून आमची सफारी निघाली. मातोंडकर रंगात येऊन सगळं सांगत होता.

प्रथम हिरण्यकेशी नदीचा उगम पहाण्यास गेलो. फार रमणीय जागा आहे. गाडी बरीच दूर उभी करावी लागते. तिथून जाण्यासाठी छोटीशी पायवाट आहे. नदीवर बांधलेला पूल आहे.



हिरण्यकेशीवरील पूल

हिरण्यकेशी देवस्थान

वाटेच्या सभोवार मोकळं रान आहे. थोडा वेळ चालल्यानंतर आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलो. तिथे एक कणसं विकणारं छोटसं दुकान होतं. पण भाजलेली कणसं नव्हेत. उकडवलेली. अजूनच उत्तम! आधी आलोय ते कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही दर्शनासाठी गेलो. गाभार्‍याबाहेर एक प्रशस्त कुंड आहे. पाय धुवून आत जाण्याची प्रथा आहे. त्या कुंडात पाय धुण्यासाठी पाऊल ठेवलं आणि अंगावर शहारा आला. थंड निवळशंख पाणी. पाय धूवून मंदिरात गेलो.



हिरण्यकेशी कुंड

हिरण्यकेशीची मूर्ती सुंदर आहे, तिच्याशेजारीच शंकराची पिंडी आहे आणि त्याच्या बाजूस गणपतीची मूर्ती. मातोंडकराने आम्हाला थोडासा इतिहास त्याच्या कोकणी मराठीत सांगितला. मंदिराचा गुरव बाजूलाच उभा होता. शर्ट पॅंट घालून पूजा चालू होती. त्याने दोन-तीन वेळेस जीर्णोद्धार हा शब्द वापरला. शेवटी नाइलाजाने १०० रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले आणि पावती मागितली. पण पावती पुस्तक घरी आहे असे सांगून त्याने हात झटकले. छान! ते पैसे खरच देवाच्या कामी येतील अशी आशा करून आम्ही बाहेर आलो. मुख्य गाभार्‍याशेजारी एक मोठी निमुळती घळ आहे. आत जाण्यासाठी सरपटत जावं लागतं. पुन्हा ऑक्सिजन अत्यंत विरळ आहे असं सांगण्यात आलं. काही वर्षांपूर्वी आत काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न झाला म्हणे. काही साहसी माणसं ऑक्सिजन सिलिंडर्स लावून आत गेली. काय काय सापडलं याचा तपशील माझ्या जवळ नाही पण त्यांना ५०० ते १००० माणूस सहज बसू शकेल असा मोठा हॉल सापडला. त्या हॉलची प्रकाशयोजना नैसर्गिक होती म्हणे. योग्य ठिकाणी घळीस भोकं होती ज्यांतून आरपार सूर्यप्रकाश आणि हवा यांचा पुरवठा घळीला होत होता. आश्चर्य आहे!

मंदिराबाहेर आता वेळ झाली होती कणसं खाण्याची. त्या आधी त्या कुंडात एके ठिकाणी गोमुख आहे तिथलं पाणी प्यायलो. आजवर गोड पाणी हे फक्त पुस्तकात वाचलं होतं. त्याचा अनुभव घेण्याची ही वेळ होती. मधुर आणि थंड पाणी. कितिही प्या पोट भरत नाही. फ्रीजमधल्या पाण्याला त्याची सर येईल काय? पुढे तिखट आणि मीठ लावून उकडवलेली कणसं खाल्ली आणि पुढच्या स्थानाच्या दिशेने निघालो.

राघवेश्वर! खूप कमी जणांना माहित असलेलं हे ठिकाणं. त्यासाठी मी मातोंडकरचा आभारी आहे. राघवेश्वर हे स्वयंभू देवस्थान! इथला सिद्धिविनायक एका मोठ्या घळीत निर्माण झालेला आहे. इथलं सारचं स्वयंभू आहे. नागाची मूर्ती, कासवाची मूर्ती. अविश्वसनीय! हे ठिकाण म्हणजे भारतदास स्वामींचे उपासना स्थान! त्यांचच समाधी स्थान! फार सुंदर, पवित्र, शांत! ना गडबड, ना गोंधळ! हिरण्यकेशी वहात वहात मंदिराच्या मागील बाजूस येते. तिथे हत्तीची मूर्ती आहे. भारतदास स्वामींच्या समाधीपाशी एक पणती अखंड तेवत असते. सकाळच्या सूर्यप्रकाशात सुद्धा ती लक्ष वेधून घेत होती. मंद तेज प्रकट करत होती. सिद्धीविनायकाची मूर्ती तर फारच देखणी आहे. पुन्हा स्वयंभू आहे त्यामुळे सारी बातच न्यारी. अक्षरश: मन प्रसन्न झालं. भारतदास स्वामींनी नुसती टिचकी वाजवली की सारे नाग, साप, हिंस्त्र प्राणी त्यांच्याशेजारी शांतपणे जमायचे अशी आख्यायिका आहे. मातोंडकराने ते स्वत: पाहीले आहे (असं तो म्हणतो). तिथेच एक फोटो सेशन झालं आणि आम्ही पुढे निघालो.

राघवेश्वर

राघवेश्वर

भारतदास महाराज समाधी

आता नांगरतास धबधबा! थोडा दूर आहे पण रस्ता मस्त आहे. पण धबधब्यास पाणी फार नव्हतं त्यामुळे पाण्याचा छोटासा प्रवाह खळाळत वहात खाली असणार्‍या कातळात पडत होता. कोकणात एक मजेशीर गोष्ट म्हणजे प्रत्येक गावास एक देव आहे. येथेही गावदेव नांगरतासकरीचा मोठा पुतळा आहे. त्याला भेट देऊन आम्ही पुढे निघालो. पाऊस झाल्यानंतर नांगरतास विलक्षण दिसेल यात शंका नाही.

नांगरतास


नांगरतास

मातोंडकराशी ४ ठिकाणं दाखवायची बोली ठरली होती त्याप्रमाणे पुढच्या स्थानाकडे तो आम्हाला घेऊन निघाला. कावळेसाद. हा एको पॉइंट आहे. प्रचंड खोल दरी. चारी बाजूनी डोंगर. कावळेसादचा अर्थ विचारला असता मातोंडकर म्हणाला, जेव्हा कधी एखादं जनावर दरीत पडतं (पडतं म्हणजे त्याची शिकार होते) त्यावेळेस कावळे दरीच्या तोंडाशी एकत्र कलकलाट करतात. त्यातून निर्माण झालेलं हे नाव. कावळेसाद. आम्ही तेथे गेलो तेव्हा पुन्हा दाट धुकं फैलत चाललेलं होतं. डोंगर आणि दरी जवळ जवळ सारी झाकोळून गेली होती. पण थोड्या वेळाने ढग ओसरले आणि समोरील लावण्य आम्हाला दिसू लागलं. खाली दाट जंगल. सारं हिरवगार. वेगवेगळ्या आकाराचे डोंगर. तिथून महादेवगड पॉईंट दिसतो असं ऐकलं होतं. धुकं निवळलं आणि तो ही दिसायला लागला. महादेवगड म्हणजे शंकाराच्या पिंडीचा आकार असलेला डोंगर. छान दिसतो. तिथेच मग निरनिराळ्या नावांनी हाका मारून एकोचा अनुभव घेतला. आपण ३डी सराउंड साउंडच कौतुक करतो. पण तिथुन निघणारा एको म्हणजे आश्चर्य आहे. एकामागोमाग एक ३ एको आम्हाला ऐकू आले. ते सुद्धा अगदी स्पष्ट आणि वेगवेगळ्या दिशांकडून. एखाद्या अतिशय खोल विहिरीत दगड पडावा आणि त्याचा प्रतिध्वनी ऐकू यावा असा तो एको होता. तिथेच मग एक चहा घेऊन आम्ही मातोंडकरचा निरोप घेतला आणि पुढील प्रवासाला निघालो. कावळेसादला माझ्याकडून १०० गुण. कधी गेलात तर जरूर अनुभव घ्या.

कावळेसाद


कावळेसाद (महादेवगड दिसतोय)


कावळेसाद

साधारण १ वाजला होता. जेवणासाठी आम्ही पुन्हा कामत मध्ये गेलो. तिथे सुंदर जेवण मिळालं. मसाला ताक तर फारच मस्त होतं. पोटभर चेपून मग आता पुढे काय याच्या विचारात आम्ही होतो. हॉटेलवर पुन्हा इतक्या लवकर जाण्यासाठी मी राजी नव्हतो. अजून काही आजुबाजुचं पहावं असं सारखं वाटत होतं आणि मग बोलता बोलता आम्हाला २ ठिकाणं सुचली. दाणोली आणि माडखोल. दाणोलीस साटम महाराजांचा मठ आहे आणि माडखोलला प्रति शिर्डी साईबाबा मंदिर आहे. प्रथम दाणोलीस गेलो. सावंतवाडीचा घाट संपल्यानंतर दाणोली गाव येतं. मठात गेलो. साटम महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. सुंदर जागा आहे. नारळी पोफळीची बनं आहेत. छोटसं कुंड आहे. तिथेच समोर एका दुकानात जरा विसावा घेण्यासाठी थांबलो. त्यांच्या घरचा गोड अननस खाल्ला. येताना त्याची खोडं घेऊन आलो आणि घरातील बागेत तो लावूनही टाकला. काही महिन्यात रुजण्यास हरकत नाही. दाणोलीवरून पुढे माडखोल ३ किमी आहे. तिथे गेलो. साईबाबांचं मंदिर सुंदर आहे. प्रशस्त आहे. तिथे सोवनी म्हणून एक गृहस्थ भेटले. १० वर्षं आनंदाश्रमाचं काम ते पहात होते. बाबा आमट्यांच्या जवळच्या साथीदारांमधले. त्यानंतर ते पावसला स्वरुपानंद स्वामींच्या मठात बरीच वर्षं कामकाज पहात होते. त्यांच्याशी बोलून बरं वाटलं. फार निरिच्छ आणि साधा माणूस!

साटम महाराज मठ (दाणोली)

तिथे जवळ जवळ ४:३० वाजले. अध्यात्मिक खूप झालं. आता काहीतरी happening करावं म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि सनसेट पॉइंटवर येऊन दाखल झालो. रस्त्यातच प्रचंड धुकं लागल होतं आता सनसेट हुकतो की काय असं वाटत होतं नेमकं तसच झालं. धुकं हटायचं नाव घेईना. अर्धा तास वाट पाहून खट्टू होऊन हॉटेल वर परत आलो. पण तरीही सतत वाटत होतं की हे धुकं हटेल आणि सनसेट पहाता येईल आणि कसं कोणास ठाऊक पण धुकं निवळलं. बहूतेक इच्छा खूप तीव्र असावी. धुकं निवळलेलं पहाताच हॉटेल वर दमून भागून येऊन, गरम चहा घेत बसलेले आम्ही सारे उत्साहाने तयार झालो आणि पुन्हा सनसेट पॉईंटवर दाखल झालो. सनसेट पॉईंटच वैभव काय वर्णावं. निसर्गाने आंबोलीवर खुल्या हातांनी ज्या सौंदर्याची बरसात केली आहे त्यातील सनसेट पॉइंट हा शिरपेच! आंबोलीच्या सनसेटचं वैशिष्ठ्य हे की उन्हं कलतांना पार दरीच्या कानाकोपर्‍यात पोचतात आणि दरी उतरत्या सोनेरी सूर्यकिरणांत नखशिखांत न्हाऊन निघते. चारी बाजुंनी डोंगर, विरळ धुकं. दाटून आलेले काळे ढग सोसाट्याच्या वार्‍यासवे पुढे पुढे सरकत होते. खाली दरीतील घरांतून दिवेलागणी चालू झालेली, एखाद्या खोपटातून संध्याकाळी पेटविलेल्या चुलीचा धूर येतोय, आणि थंड हवा मन प्रफुल्लित करून जातेय. काय आणि किती सांगू? थोड्या वेळाने ढग पुन्हा दाटून आले. सूर्यास्त दिसला नाहीच. पण ढग विरळ होते तोवर हे सारं सौंदर्य आम्हाला दिसलं. मावळतीची किरणं दिसली, संधीप्रकाशाचा खेळ दिसला, वारा आणि ढगांची पाठशिवण दिसली. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. हळूहळू आकाशात चंद्र अवतरला, संधीप्रकाश कमी कमी होत गेला. तिथे नुसतं बसण्यात एक दीड तास सहज निघून गेला होता. त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही हॉटेल वर परत आलो.

सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट


सनसेट पॉईंट

सनसेट पॉईंट

हॉटेलवर येताच गरम पाण्याने आंघोळ झाली. फ्रेश होऊन बाहेर कट्ट्यावर बसून राहीलो. आंबोलीत असतांना निसर्गाचे सारे सोहळे पहाण्यास मिळाल्याबद्दल मी आनंदात होतो. मुसळधार पाऊस पाहीला. खाली उतरेलेले ढग पाहीले, दाट धुकं पाहील, चिंब भिजलेलं घनदाट जंगल पाहीलं, सोनेरी ऊन पाहीलं. काय राहीलं अजून? रात्री मी आणि बाबा नार्वेकरांच्या खानावळीत मालवणी खाण्यासाठी गेलो. जेवण ठीक होतं. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने, नार्वेकरांनी सुचवलेला खाडीतला मासा खाल्ला. त्याचं नावं शतकं किंवा शेतुक. बांगड्याच्या चवीशी मिळती जुळती चव होती. खमंग! आता उद्या परतायचे हा विचार समोर उभा ठाकला आणि मन खिन्न झालं. पण पुन्हा लवकरच परत येण्याचा निर्धार करून मी पलंगावर अंग टाकलं आणि गाढ झोपी गेलो.

आंबोलीतील शेवटचा दिवस उजाडला. चहा झाला. आवरून झालं. सार्‍यांना भेटून झालं. बॅग्स उचलल्या आणि जड मनानी आंबोलीचा निरोप घेतला. तीन दिवस आयुष्यातील सारी दु:ख, ताणतणाव, विवंचना या आंबोलीनी पोटात घेतल्या होत्या आणि आम्हाला पुन्हा एकदा सज्ज करून ती तिच्या कार्याला सिद्ध झाली होती.

ते सारं मनात साठवून मी गाडीला स्टार्टर मारला आणि भरधाव गाडी सोडली. आता पुढचा पल्ला नरसोबाची वाडी. आंबोली ते कोल्हापूरपर्यंतचा रस्ता उत्तम आहे हे वर सांगितलेलचं आहे. आम्हाला तिथपर्यंत येण्यास फक्त अडीच तास लागला. सांगली फाट्यावरून जयसिंगपूरवरून वाडीला जाण्याचा माझा बेत ठरला होता. त्याप्रमाणे आम्ही कोल्हापूरच्या वेशीपर्यंत आलो आणि तिथे काय झालं होतं हे माहीत नाही? न भूतो न भविष्यति असा ट्रॅफिक! सारा हायवे तुंबलेला. ५०० च्या वर ट्रक अडकून पडलेले. सगळीकडे गोंधळ. सर्विस रोडवरून मागे जाऊन कागलच्या रस्त्याने जावं तर सर्विस रोड जॅम पॅक्ड. देवाच्या मनात आहे का आम्ही त्याच्या दर्शनाला यावं असं बर्‍याचदा वाटून गेलं आणि तो ट्रॅफिक बघून माझी चांगलीच तंतरली. म्हटलं झालं, आता २-३ तास सुटका नाही. पण देवाच्या इच्छेविरुद्ध काही कधी घडलय का? तिथेच एक माणूस भेटला. त्यानी सांगितलं कोल्हापूर शहरातून, उंचगाव-हुपरी-रेंदाळ-बोरगाव मार्गे एक रस्ता आहे नृसिंहवाडीस जाण्यासाठी. नशिबानी मी कोल्हापूराच्या कमानी जवळच होतो. सरळ गाडी कोल्हापूर शहरात घातली. एसटी स्टॅंड वरून डाव्या हाताला वळलो. तिथे एक निमुळता बोगदा आहे. तिथे पुन्हा भलीमोठी रांग होती. तिथून कसाबसा बाहेर पडलो आणि विचारत विचारत उंचगावच्या रस्त्याला लागलो. उंचगाववरून हुपरी, हुपरीवरून रेंदाळ, रेंदाळवरून बोरगाव, बोरगाववरून कुरुंदवाड आणि तिथुन वाडी असा प्रवास करून मी खरतरं आता थकून गेलो होतो. बोरगावला आणि कुरुंदवाडला मध्येच भाषा बदलते. एकदम कन्नड बोर्डस दिसायला लागतात. थोडक्यात काय कर्नाटकाच्या वेशीला चाटून आमचा प्रवास चालू होता. पण थकून सांगतो कुणाला? देवानी मार्गातला अडथळा दूर केला होता ही किती मोठी गोष्ट!

वाडीला गेलो. कृष्णेत हातपाय धुतले. नमस्कार केला आणि आमच्या पुजारी गुरुजींसोबत देवाचं दर्शन घेतलं. त्यांनी संकल्प सोडून घेतला. प्रसाद दिला. समाधान वाटलं. शेवटी आपण करू करू म्हणून काहीही होत नाही हे खरं. एक अदृष्य शक्ती आहे जी सारं हलवत असते. आपण पटावरील बाहूल्या म्हणून वावरावं. ३ वाजून गेलेले असले तरी पुजारींच्या घरी अत्यंत प्रेमाने आम्हाला जेवायला वाढलं. पूजेसाठी काही पैसे देऊन आम्ही पुण्याचा रस्ता धरला. जातांना पुजारींच्या मुलाने आम्हाला रस्ता सांगितला होता त्या रस्त्यावरून आलो. तो रस्ता म्हणजे, के.पी.टी - उदगाव - सांगली - पेठ. मी आपला गाडी चालवतोय चालवतोय. रस्ता संपायचं नावं घेईना. जीव मेटाकुटीला आला. शेवटी एकदाचा तो पेठनाका आला आणि आम्ही राजरोस मार्गावरून कराडकडे निघालो. आधीचा रस्ता मला या येतानांच्या रस्त्यापेक्षा जवळ वाटला. आता पेठ ते पुणे २२५ किमीचे अंतर कापायचे होते. स्पीड मारला. थोड्यावेळाने कराडला येउन दाखल झालो. पण कराडला थांबून काय करणार? तसाच पुढे सातार्‍यापर्यंत गाडी मारली, अजून ५० किमी. सातार्‍याला पोचलो तेव्हा ७ वाजून गेले होते. संध्याकाळ झालेली. तिथेच एका हॉटेलात चहा घेतला आणि सिगरेट मारली. अहाहा.... त्या धुरावर तरंगलो. पण अजुन १२५ किमी अंतर होतंच. तिथुन पुन्हा गाडी मारली. रस्त्यात मध्येच पाऊस, अंधार. रात्रीच्या वेळेस तोच रस्ता किती मोठा वाटतो. रस्ता काही केल्या संपत नव्हता. आणि असचं करता करता शेवटी एकदाचा तो कात्रजचा बोगदा आला. दरीपूल दिसायला लागला. पुण्याच्या वेशीवर आम्ही दाखल झालो आणि रात्री १० वाजता घरी पोचलो. सकाळी ८:३० ते रात्री १०:०० असा अविश्रांत प्रवास झाला. गाडी पार्क करत असता, मी ट्रीप मीटरवरचा आकडा पाहिला. ४८० किमी सकाळपासून. मी आजवर एका दिवसात पार केलेलं ते पहिलचं मोठं अंतर. अंग आंबून गेलं होतं. घरची मंडळी आमटी भात टाकण्यासाठी म्हणून कार्यरत झाली. मी फ्रेश झालो. जेवण केलं. थोड्याच वेळात सगळीकडे पांगापांग झाली. सारेच दमलेले, गाढ झोपेच्या आधीन झाले. मी अजुन जागाच होतो. कॅमेर्‍यातून ते सारे फोटोस पहिल्यांदा लॅपटॉपवर डाउनलोड करून घेतले आणि एक एक फोटो पहायला लागलो. अगदी सुरूवातीपासूनचे. पुण्यावरून निघालो, शिरवळ, सातार्‍याचं माइलस्टोन, पुढे कोल्हापूर, अंबाबाईचं मंदिर, बेळगावकडे जाणारा बेळगावी लोण्यासारखा रस्ता, तिथून गडहिंग्लज, मग आंबोली, आमचं रेसॉर्ट, सावंतवाडी, साधले मेस, रेडी गणपती, हिरण्यकेशी, राघवेश्वर, नांगरतास, कावळेसाद, दाणोली, माडखोल, नार्वेकरांची आंबोली बाजारातील मेस, नरसोबाची वाडी....

४ दिवसांचा हा प्रवास. पण किती सुंदर, किती enriching, किती मनमोकळा, किती निसर्गाच्या सानिध्यात! रात्र शांत होत गेली. झोपायच्या आधी सिगारेट पेटवली आणि खिडकीत शांतपणे धुराची वलयं काढत उभा राहीलो.

एक आवाज म्हणाला... केदार... मनावर कोरलेल्या गोष्टींचं विस्मरण होत नसतं.

तेवढ्यात दुसरा आवाज म्हणाला.... छे... छे... त्या विलक्षण दिवसांचं विस्मरण व्हायला नको म्हणून कुठेतरी नोंद असायलाच हवी. काहीही असो, काहीतरी लिहिण्यास सुरूवात करावी असं वाटलं आणि सुरूवात त्याच रात्री केली. ते लिखाण आज पूर्ण झालं. आंबोलीवर तसं कुणीही कितीही लिहावं अन् ते प्रत्येक वेळेस नवच वाटेल असं ते सौंदर्यं. ते अनुभवण्यासाठी फक्त एकच गोष्ट हवी... रसिकता... धुम्र वलयांवर तरंगत एक जुनं बालगीत माझ्या ओठांतून आत्ता बाहेर पडतय...

हिरवी झाडी, पिवळा डोंगर,
निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे
वार्‍याची पावरी.

सोनावळिच्या सोनफुलांचा
बाजुस ताफा उभा
तलम धुक्याची निळसर मखमल
उडते, भिडते नभा.

हिरवी ओली मखमल पायी
तशी दाट हिरवळ
अंग झाडतो भिजला वारा
त्यात नवा दरवळ.

गोजिरवाणे करडू होउन
काय इथे बागडू?
पाकोळी का पिवळी होउन
फुलांफुलांतुन उडू?


आंबोली मला खुणावतेय... डोंगरांच्या कुशीत वसलेली चिंब ओली आंबोली मला पुन्हा पुन्हा खुणावतेय...

तुमचा,
केदार

Friday, June 24, 2011

प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे

आज रविवार! जेवून दुपारी झोपलो आणि उठलो तेव्हा संध्याकाळचे ६:०० वाजले होते. उगाच मग थोडा वेळ टंगळ मंगळ केली. गरम पाण्याने एक वॉश घेतला आणि फ्रेश होऊन घराबाहेर पडलो. रविवारची संध्याकाळ, शांत, निवांत, आळसावलेली... अशा संध्याकाळी करण्यासारखं काही विशेष नसलं की पावलं आपसूक वळतात तुळशी बागेकडे. तुळशी बागेतील राममंदिर म्हणजे माझं श्रद्धास्थान! आम्ही जेव्हा लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला यायचो तेव्हा हटकून तुळशीबागेला भेट द्यायचो. खेळण्यांच्या दुकानात ठिय्या मारून बाबांकडे नाहीतर काकाकडे हव्या त्या खेळण्यांसाठी हट्ट धरायचो. माझं आणि तुळशी बागेचं नातं आहे ते तेव्हापासून. आजही तिथे गेल्यावर मन प्रसन्न होतं. सार्‍या कोलाहलातून मन:शांतीकडे नेणारी ती प्राचीन वास्तू, सौभाग्य अलंकारांची दुकानं, अगदी चुलबोळक्यांपासून ते खर्‍याखुर्‍या संसारमांडणीपर्यंत सार्‍या गोष्टी मिळण्याचं पुण्यातील एक हक्काचं, आपुलकीचं स्थान! प्रवेश करताच, चंदन, काश्याची वाटी, पूजा साहित्य, देव्हारा, पितळी वस्तू विकणारी ती छोटीशी दुकानं. त्यात वर्षानुवर्षं घुमत असणारा चंदनाचा, उदबत्त्यांचा परिमल, कुठे दागिने, चांदीच्या मांडून ठेवलेल्या वस्तू. झगमगाटापेक्षा साधेपणात जास्त सौंदर्य असतं हे पटवून देणारी आमची तुळशी बाग!

असो. तर गाडीवर टांग टाकली आणि तुळशी बागेत पोहोचलो. (पुण्यात आम्ही दुचाकी, चारचाकी सार्‍यालाच 'गाडी' असं संबोधतो.) दिवे गेलेले होते त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात सारे व्यवहार चालू होते. खुद्द राममंदिरात सुद्धा दिवे नव्हते. मनाला थोडासा आनंद झाला. सगळीकडे अंधार असतांना, फक्त एका समईच्या प्रकाशात देवाचा गाभारा, मूर्ती अद्वितीय दिसते. रामाचं, दास मारूतीचं दर्शन घेतलं, थोडा वेळ सभामंडपात विसावलो आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी पुढे झालो. तुळशी बागेतील राममंदिरातील प्रदक्षिणा मार्गाच्या अगदी सुरूवातीस, वर भिंतीवर स्वामी रामकृष्ण परमहंसांचं एक विधान लिहिलेलं आहे. ते मी आजवर असंख्य वेळा वाचलेलं आहे पण जेव्हा कधी मी ते पुन्हा वाचतो तेव्हा तेव्हा तोच आनंद, उत्साह, औत्सुक्य आणि उर्मी अनुभवतो. ईश्वराच्या जवळ जाण्याविषयी, साधनेविषयी त्यात काही अभूतपूर्व असं लिहिलेलं आहे. तो एक गुरूमंत्रच आहे, सोप्या शब्दात मांडलेला!


या बाबतीत माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट अशी. माझी मुलुंडची मावशी आमच्याकडे पुण्याला रहाण्यास आली होती. उषामावशी. त्यावेळेस मी मास्टर्स करत होतो. शिक्षण चालू असल्याने रियाज करण्यास वेळ मिळत असे. मी पहाटे लवकर उठून तानपुरा जोडून रियाज करत बसे. त्या दिवशी सुद्धा तसाच देवघराच्या खोलीत बसलो होतो. राग निवडला होता भैरव! भैरव कमालीचा राग आहे. जितका गोड तितकाच धीरगंभीर! पहाटेच्या वेळेस गाण्याचा हा राग. यातील कोमल रिषभ आणि कोमल धैवताची जादू काही औरच आहे. पुन्हा कोमल रिषभावर आंदोलन आहे. आंदोलन म्हणजे त्या स्वराचं केलेलं गोलाकार आवर्तन! कोमल धैवतावरून पंचमावर उतरण्यातील आणि कोमल रिषभावरून शुद्ध गंधारावर जाण्यातील आनंद हा एक अनुभव असतो. मी गात बसलो होतो. उषामावशीने ते ऐकलं आणि खोलीत माझ्या नकळत ती येऊन बसली. माझी आलापी चालू होती. तानपुर्‍यातून गंधाराची निष्पत्ती अमाप होत होती. त्यात माझा गंधार सुद्धा त्या दिवशी अगदी मिसळून जात होता. प्रत्येक स्वराला एक उंची असते. त्या उंचीचा स्वर बरोबर लागला की आपण म्हणतो frequency match झाली. एखाद्या माणसाशी frequency match होणं म्हणजे अजून काय? स्वर माणसांसारखे असतात. त्यांच्याशी मैत्र जमले की त्या घोळक्यात कधीही एकटं वाटत नाही, एकटं असूनसुद्धा. माझा रियाज झाला आणि मी उठलो. पहातो तर उषामावशी मागेच बसली होती. मला मजा वाटली. तीने सुद्धा तोंड भरून कौतुक केलं आणि त्यापुढे तीने मला जे सांगितलं ते मी कधीही विसरणार नाही. ती म्हणाली

"केदार, परमेश्वर प्राप्तीचा अर्थ शोधायचा म्हणजे काय? तो आपल्यातच लपलेला, रुजलेला आहे. त्याची रूपं असंख्य आहेत. त्यामुळे एखादी सुंदर गोष्ट पहाशील, अनुभवशील त्यावेळेस तिथे परमेश्वर आहे असं समजण्यात काहीच वावगं नाही. आज तू रियाज केलास. गंधार लावलास. त्या गंधारातून जे सौंदर्य, जो आनंद निर्माण झाला त्यात परमेश्वर आहे हे विसरू नकोस. परमेश्वर असाच कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देत असतो."


त्यावेळेस मला कळलं की
frequency match होणं म्हणजे काय? जसा रेडिओ एखाद्या frequency ला लागतो तसच हे. अगदी मनापासून देवाचं दर्शन घेत असता, मनात एखादी इच्छा यावी आणि एखादं फूल मूर्तीवरून टपकन पडावं याचा अर्थ सुद्धा माझ्या मते हाच आहे.

सगळीकडे frequency आहे. ती जिथे match होते तिथे सूर उमटतात, जिथे होत नाही तिथे असूर उपटतात. स्वामी रामकृष्ण परमहंसाचं ते विधान मी याच दृष्टीने बघतो. ईश्वरप्राप्तीचा अर्थ शंखचक्रगदाधारी प्रकटणं हा नव्हे, छोट्या छोट्या गोष्टीत ईश्वराचा सहवास अनुभवणं आणि त्यावर unbiased विश्वास ठेवणं हा आहे. पुन्हा साधनेला समर्थपण येण्यासाठी सातत्याची जोड हवीच आणि नेमकं हेच त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. एरवी जबाबदार्‍यांच्या ओझ्याखाली दबून गेलेला आणि संसार, कामकाज यात स्वत्व हरवून गेलेला मनुष्य एखाद्या स्वत:ला हव्या असलेल्या पण हरवून गेलेल्या मार्गावर चालण्यासाठी पुन्हा पुन्हा सज्ज होतो यालाही सातत्यच म्हणायचे ना? माझ्या प्रत्येक भेटीत तुळशीबागेतील राममंदिरात जतन करून ठेवलेलं हे विचारधन माझ्या मनावर आनंदघन म्हणून बरसतं आणि मला सातत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करतं. स्वामी परमहंस म्हणतात...

"अथांग महासागरात मौल्यवान मोती वैपुल्याने मिळतील, परंतु ते मिळविण्याकरता तुला अचाट साहस लागेल. जरी तुला काही वेळा अपयश आले तरी सागरात मोती नाहीतच असे म्हणता येणार नाही. सातत्याने न खचता प्रयत्नशील राहिलास तर यश खात्रीने तुझेच आहे.

त्यापेक्षाही कष्टतर अनुभव मानवास ईश्वर साधनेबद्द्ल प्रत्ययास येईल. वैफल्याने खचून न जाता तू अविश्रांत प्रयत्नशील राहिलास तर मी विश्वासपूर्वक सांगतो की ईश्वर तुझ्या जवळच येईल.

प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे.


तुमचा,
केदार

हाच लेख येथेही वाचता येईल.

Monday, June 13, 2011

मन सुद्ध तुझं!

३-४ दिवसांपासून काहीसं उदास वाटतयं. त्याला काही कारणं आहेत. काही करू नये असं वाटतय. हातून काही विशेष घडत नाहीये. स्विमिंग बंद पडलयं कारण समर कॅंम्प्स चालू आहेत. एकच बॅच असते दिवसभरात आणि ती बॅच कधीकधी चुकते. ऑफिसमधून येण्यासाठी उशीर होतो वगैरे... मग काल संध्याकाळ पण तशीच चालली होती. का कोणास ठाऊक 'मारवा' ऐकावासा खूप वाटत होता. स्वत:च गायला बसणार होतो, तानपुरा काढून ठेवला होता पण पुढे त्याचीही इच्छा होइना. कधी कधी self-motivation कमी पडतं. मग youtube वर भीमसेनजींचा 'मारवा' ऐकला. 'बंगरी मोरी' हा त्यांचा प्रसिद्ध छोटा ख्याल. काय एक एक सूर लावलाय पंडीतजींनी! पण त्यामुळे व्हायचा तो परिणाम शेवटी झालाच. अजूनच कातर वाटायला लागलं. कसली तरी हुरहुर जाणवायला लागली. अन इतक्यात काही जुन्या मराठी गाण्यांचे दुवे डोळ्यांपुढे आले. असच सहज बघता बघता 'कुंकू' चित्रपटातील एक गाणं सापडलं. आईला बहूतेक मी काहीसा उद्विग्न आहे हे कळलं असावं. ती सुद्धा माझ्या खोलीत येऊन गेली. अन् तितक्यात streaming संपून ते गाणं लागलं आणि शब्द उमटायला लागले. आई काहीच बोलली नाही फक्त माझ्या पाठीवर एक आश्वासक थाप देऊन हसत हसत कामासाठी बाहेर निघून गेली.

मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची ||

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची ||


हाताच्या मुठी आपसुक वळल्या. छे... आयुष्यात अचाट दु:ख आहे पण निराशेच्या दलदलीतून खेचून बाहेर काढणारे काही अदृष्य हातही आहेत. आपण फक्त हात पुढे करण्याचा अवकाश...

अन् आज मला खूप बरं वाटतयं. काल पेक्षा खूप बरं! पण वर म्हटल्याप्रमाणे या माझ्या सुधारित मनस्थितीत बर्‍याच जणांचा हात आहे. गीतकार शांताराम आठवले यांचा, संगीतकार केशवराव भोळे यांचा, पेटीवर जिवंत साथ करणार्‍या वसंत देसाई यांचा, शब्द सूर अभिनयातून काळजापर्यंत पोचविणार्‍या मा. परशुराम यांचा आणि एक हात पाठीवरचा...

तुमचा,
केदार

Thursday, June 2, 2011

पाऊस आला...


पाऊस आला की मला दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते. पार्ल्याची माझी शाळा आणि माझं बालपण ही पहिली गोष्ट. मे महिन्याची सुट्टी संपून शाळा पुन्हा चालू व्हायची ती याच सुमारास. घराबाहेर पावसाच्या पाण्याचं तळं व्हायचं. कधी कधी मी रहात असलेल्या सुभाष रोडवर तर गुडघ्याएवढं पाणी असायचं. त्यातून वाट काढत जाण्यास मजा यायची. कधी कधी शाळेला सुट्टी मिळायची त्यावेळेस तर काय धमाल. आम्ही होड्यांचा खेळ खेळायचो. पावसात मनसोक्त भिजायचो. आईची मग हाक यायची. चिखलात माखलेला मी... आई खसखसून आंघोळ घालायची. कधी भजी, कधी वडा, कधी डोसा असं काहीतरी नाविन्यपूर्ण खायला असायचं. ते खायचं आणि पाऊस बघत आतल्या खिडकीला लागून असलेल्या बिछान्यावर पडून रहायचं.

दुसरी गोष्ट म्हणजे माझं पुण्यातील डी.एस.के. विश्वमधील घर. आधीच ते डोंगरांनी वेढलेलं. आपण जरी हातांनी झाडांना, रोपांना कितीही पाणी दिलं, तरी पाऊस प्यायल्यानंतरचं त्यांच रूप वेगळच दिसतं. तेच रूप समोर चारीही दिशांना दिसायचं. सभोवार सारे हिरवे-पोपटी छटा ल्यालेले डोंगर, तुडुंब भरलेले खडकवासला, सगळीकडे पसरलेलं धुकं. त्यात संध्याकाळ झाली की धुक्यातून लागत जाणारे दिवे समोर अंधूक अंधूक दिसायचे. सारं पुणचं समोर पसरलेलं. पहाणार तरी किती आणि कुठे? निसर्ग असा धुक्याची दुलई लेऊन शांत पहुडला असता आपणही अंगावर मऊ दुलई घेऊन पडून रहायचं. कुणाची कटकट नाही, गडबड नाही, आपणं आपले आणि आपलं कुणीतरी... आज मी त्यापासून दूर आहे पण पाऊस आला की त्या सार्‍या गोष्टी पुन्हा स्मरतात. म्हणावसं वाटतं...

ए आई, मला पावसात जाऊ दे...
एकदाच ग भिजूनी मला चिंबचिंब होऊ दे...

ती निरागसता आता शक्य नाही. माझ्यातील तारुण्याने माझ्यातलं बाल्य माझ्यापासून हिरावून नेलयं. पण तरीही लहानपणी पाहिलेली एक जाहिरात नेहमी आठवते. त्यात ऊंचावरून फेसाळत पडणारा एक धबधबा आठवतो, आकाशात उडणारे पक्षी आठवतात, हिरवागार माळ आठवतो आणि मग मनात त्या जाहिरातीतील शब्द रुंजी घालायला लागतात...

चल मन् चल उस और चले जहाँ होता ह्रदय प्रफुल्लित भी
जहाँ पंख पसारे बिना भय के खुले गगन मे उड सके मन भी...

सर्वांना पहिल्या पावसाच्या शुभेच्छा!

तुमचा,
केदार

Sunday, May 29, 2011

ह्यूस्टन डायरी!

मी मागील लेखात लिहीले होते "आयुष्य कधी कोणते रंग दाखवेल काही सांगता येतं नाही. म्हणून दु:खासाठी स्वत:ला तयार करण्यासोबत, सुखाचं स्वागत करण्यासाठी कायम तयार रहाणं हे ही तितकचं योग्य." माझी ह्यूस्टनची सफर हे वाक्य सत्य आहे याची प्रचिती देणारी ठरली. तीच ही ह्यूस्टन डायरी. असच लिहावसं वाटलं. मन मोकळं करावस वाटलं. मिळालेला आनंद वाटावासा वाटला. इतकच!

मागील शुक्रवारी मी भारतात परत आलो. पु.लं.नी "म्हैस" या त्यांच्या कथेत म्हटल्याप्रमाणे "परदेशी जातांना मी का चाललोय आणि भारतात परत येतांना मी इथे का परत आलोय" अशी काहीशी द्विधा मनस्थिती माझी होती; बहुधा जेटलॅग असावा. मुंबई विमानतळावर माझं सामान येण्यास जवळ जवळ १ तास लागला. ३:०० ला पहाटे उतरलेला मी, ५:०० ला बाहेर आलो आणि त्यानंतर लगेचच पुण्याकडे रवाना झालो. तिथल्या प्रसन्न, थंड हवेतून एकदम मे महिन्याच्या उन्हाळ्यात पडण्याची ही माझी पहिली वेळ नव्हे. जो मानसिक त्रास व्हायचा तो झालाच. मी स्वप्नातून वास्तवात आलो होतो. "पहाटेचा गार वारा" वगैरे कवि-कल्पना हवेत विरून गेल्या. एक दोनदा तर ड्रायवरनी हॉर्न वाजवल्यावर मी चक्क दचकलो. एक दीड महिना माझा आणि हॉर्नचा तसा काही संबंध नव्हता. असो...

ह्यूस्टन हे अमेरिकेतील दक्षिणेकडचे गाव, टेक्सास प्रांतातील, मेक्सिकोच्या बॉर्डरवर असणारं, खूप स्पॅनिश लोकसंख्या असणारं, प्रशस्त. माझा ह्यूस्टनला जाण्याचा योग केवळ कामामुळे आला. पण ह्यूस्टनने काही इतक्या सुंदर आठवणी दिल्या आहेत की त्या विसरणं शक्य नाही. मी, प्रसन्न आणि शिवम. आमचा छोटासा पण मस्त ग्रूप. ग्रूपमधील सार्‍यांची तोंडं विरुद्ध दिशांना पण मस्ती मात्र एकत्र, काम एकत्र आणि मन लावून. त्यामुळे कोणालाच कधीच कामाविषयी सूचना कराव्या लागल्या नाहीत. अगदी योगायोगानी ही मंडळी भेटली आणि काही दिवसातच अगदी जवळची झाली. स्वत:ची दु:ख उघडपणे मांडू लागली. मलाही त्यांच्याशी बोलतांना हलकं वाटू लागलं. सोमवार ते शुक्रवार कसे जायचे ते ठाऊक नाही. मग शनिवारी दुपारपर्यंत झोप झाली की शिवम हॉटेलवर आम्हाला घेण्यासाठी यायचा. मग लंचला कधी इटॅलिअन, कधी इंडीयन, कधी मेक्सिकन, कधी सब-वे मधलं माझं लाडकं टुना सब, कधी फ्राईड चिकन, कधी फक्त एखादा बर्गर तर कधी बार्बेक्यू चिकन. खाण्यापिण्याची रेलचेल असायची. काहीही खायचो पण कधीही त्रास झाला नाही. उत्तम हवा हे कारण असावं.

मी रहात होतो ते Extended Stay हॉटेल अगदी माझ्या मनाजोगतं होतं. त्यात अपार्टमेंट हॉटेलच्या सार्‍या खूबी होत्या. म्हणजे अगदी इस्त्री पासून ते कुकींग रेंजपर्यंत सारं काही. बिछाना अगदी प्रशस्त. रात्री पाठ टेकली की डाऊनटाऊनमधील दोन टॉवर सदैव समोर चमचमत असायचे. माझ्या एकटेपणाला त्यांची मूक सोबत होती. रूममध्ये एक लेझी चेअर सुद्धा होती. तीत ऐसपैस बसून सूप वगैरे पिण्यास मजा येत असे. पुन्हा अपार्टंमेंटला dedicated swimming tank होता.

माझं अमेरिकेतील घर

ऑफीसमधून हॉटेलवर आलो की मी स्विमिंग न चुकता करत असे. १८:१५ ला ऑफिसमधून घरी आलो की १८:३० ला स्विमिंग टॅंक. तिथे ३०-४५ मिनटं पोहायचं. कधीही हा क्रम चुकला नाही. मग रूममध्ये जायचं. गरम पाण्यानी टब भरायला लावायचा आणि आंघोळ करून मस्त फ्रेश व्हायचं. कामाचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जायचा.


अपार्टमेंटमधील स्विमिंग टॅंक

त्यानंतर मी आणि प्रसन्न फिरण्यासाठी जायचो. घराजवळ 'फीएस्टा' म्हणून मोठा मॉल होता. 'सुपर टारगेट' नावाचं सुपर मार्केट होतं. तिथे नुसतं फिरलं तरी दोन तास निघून जायचे. मी तिथून संध्याकाळसाठी काहीतरी विकत घेत असे. कधी फक्त दूध, फळं, प्रून्स, पीचेस. माझा सिगारेटचा ब्रॅंड होता 'मार्लबोरो स्पेशल ब्लेंड'. एखादं ते पाकिट. अशी छोटी मोठी खरेदी करून आम्ही पुन्हा हॉटेलवर परतत असू.

सुपर टारगेट मॉल

तिथे एक 'फ्रेंचीज' म्हणून रेस्तंरॉं चेन आहे. तिथलं फ्राइड चिकन आणि गंबो सूप म्हणजे केवळ आनंदाची पर्वणी. 'गंबो'त काय असतं हे मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहीलं आणि मी सुद्धा जाणून घेण्याचा विशेष प्रयत्न केला नाही.

फ्रेंचीज्

शिवमच्या गाडीतून जातांना kaskade and deadmau5 ची गाणी ऐकत जाणं म्हणजे आमच्यासाठी सुख होतं. त्यात प्रसन्न कधीकधी एकदम नाचायला सुरूवात करायचा. हळूहळू सारेच जण ती गाणी ऐकण्यात बेहोश होऊन जायचे. एक गाणं जे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही ते म्हणजे "I remember" by kaskade and deadmau5.


प्रसन्न त्याच्या रूममधून कधीतरी रात्री फोन करून मग ई-सकाळ वाचून दाखवायचा. मला खरतरं त्या सार्‍या त्याच त्याच बातम्यांपासून दूर रहायचं होतं. पण तो इतक्या मजेशीरपणे सांगायचा की मग मी सुद्धा माझ्या रूममध्ये ई-सकाळ उघडून बसायचो.

पहिल्या रविवारी मी आणि शिवम डाऊनटाऊनला गेलो. तिथे लहान मुलांचा समर कॅंप भरला होता. सगळी गर्दी. रंगीबेरंगी पोषाखातील गोड मुलं. वेगवेगळे वेष केलेली. डाऊनटाऊन ऍक्वेरीअम पहाण्यास जायचं होतं. त्या आधी फिरता फिरता मला हार्ड रॉक कॅफे दिसला. बरीच वर्ष तिथे जायचं होतच. भारतात ते आजवर शक्य झालं नाही. मला रॉक संगीत तुफ्फान आवडतं. आम्ही पोटेटो स्किन्स आणि चीज चिकन मागवलं आणि गाणी ऐकत, गप्पा मारत वेळ छान घालवला. दुर्दैवाने लाइव बॅंड ऐकण्यास मिळाला नाही. पण तरीही हार्ड रॉक कॅफे ला जाता आलं हे खरं सुख.

ह्यूस्टन डाऊनटाऊन हार्ड रॉक कॅफे

ह्यूस्टन स्कायलाईन

कामाचा ताण होताच. तो दिवसेंदिवस वाढतही होता. पण या सार्‍यातून वेळ काढून आम्ही खूप फिरलो. गॅल्वेस्टन आयलॅंड, हर्मन पार्क ची आमची सफर मस्तच झाली. गॅल्वेस्टनला शिवमचा एक मित्र रहातो. तिथे त्याच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही गेलो. अपार्टमेंटमध्ये अप्रतिम आणि ऊंची स्पा होता. त्यात नंतर जायचं असं सर्वानुमते ठरलं. मग आम्ही बीचवर जाण्यासाठी सज्ज झालो. त्याआधी फेरीतून गॅल्वेस्टन पलिकडील एका बेटावर जाऊन आलो. फेरीचा अनुभव फारच वेगळा होता. समुद्रात दिसणारे डॉल्फिन्स, जेली फिश, मधूनच लांबवर दिसणारा एखादा दीपस्तंभ आणि डोक्यावर अविश्रांत उडणारे देखणे सी-गल्स यामुळे ती फेरी अविस्मरणीय झाली.

गॅल्वेस्टन आयलॅंड

सी-गल्स

प्रसन्न आणि शिवम

फेरी

Gulf of Mexico लहानपणी पुस्तकात वाचलं होतं पण त्या अथांग समुद्रात डुंबण्याची मजा काही औरच होती. अजस्त्र लाटा किनार्‍यावर येत असतांना त्यांच्यातील शक्तीची आणि समुद्राच्या गहीरेपणाची कल्पना येत होती. थोडीशी भिती वाटत होती पण तरीही समुद्रात खूप पुढपर्यंत आम्ही गेलो. जितके पुढे जाण्याचा प्रयत्न करू तितक्याच वेगानी आम्ही परत किनार्‍यावर फेकले जात होतो. पण तो अनुभव छान होता.

गल्फ ऑफ मेक्सिको

गल्फ ऑफ मेक्सिको

गॅल्वेस्टन अपार्टमेंटमधील स्पा

गॅल्वेस्टन अपार्टमेंटमधील स्पा

गॅल्वेस्टन अपार्टमेंटमधील स्पा

भूक लागली तसे आम्ही एका चायनीज रेस्तरॉंमध्ये गेलो. तिथे चिकनपासून बेडकापर्यंत सारं काही यथासांग मांडून ठेवलेलं होतं. मी बेडूक खाल्ला हे मला आता सांगण्यास कसंतरीचं वाटतयं. पण आयुष्यात सगळ्या गोष्टींचा एकदा तरी आस्वाद घ्यायचा होताच. शिवमच्या मित्राने आणि मित्राच्या बायकोने अतिशय प्रेमाने आमचं आदरातिथ्य केलं.

हर्मन पार्क ही ह्यूस्ट्नमधली जॅपनीज बाग. तिथे चेरी ब्लॉसम पहाण्यास मिळेल या आशेवर तिथपर्यंत गेलो. चेरी ब्लॉसम पहाण्यास मिळाला नाही पण तरीही बाग अत्युत्तम होती. मोठा लेक, त्याच्यात बदकं, सारस पक्षी, बाजूने सगळी फुलं, दूरवर पसरलेली हिरवळ. मजा आली. तिथे बॅले नृत्याचा कार्यक्रम होणार होता.


बॅले

'बॅले'तील कलाकार

तसेच काही काळ थांबलो. बॅलेची तिकिटे घेऊन सभागृहात जाऊन बसलो. ओपेरा संगीताच्या पार्श्वभूमीवर चालू असणार्‍या त्या नृत्याने पश्चिम संस्कृतीचे रंग अलगद उलगडले. संध्याकाळ होत चाललेली, अंधूक दिवे लागत चाललेले अन् अशा कातरवेळी मनात प्रेमासाठीची आर्तता निर्माण करणारा तो नृत्यप्रकार पाहून मन काहीसं हळवं झालं. त्यातील सारेच कलाकार एकापेक्षा एक सरस होते. तिथेच मग एक हॅमबर्गर खाऊन आणि स्लश-पपी पिऊन आम्ही घराचा रस्ता धरला.

हर्मन पार्क

हर्मन पार्क

माझा तिथल्या ऑफिसमधील अमेरिकन मित्र, स्टीव. अत्यंत गप्पिष्ट. ह्या माणसाने खूप मजा करविली. मी अमेरिकेला पहिल्यांदाच आलो आहे हे कळल्यावर तर त्याच्या उत्साहाला पारावर उरला नाही. सतत अमेरिकन संस्कृतीतील काहीतरी सांगत राहीला. दाखवत राहीला. देत राहीला. त्याला माझं नावं बोलता यायचं नाही. प्रेमाने तो मला केडी म्हणायचा. एक दिवस ऑफिसनंतर मी हॉटेलवर गेलो असतांना, हा त्याच्या गर्लफ्रेंडला आणि शिवमला बरोबर घेऊन मला घेण्यासाठी आला. मला आश्चर्य वाटलं. मला म्हणाला, "गाडीत बस". मी बसलो. कुठे चाललोय हे कुणीच सांगायला तयार नाही. त्याची गाडी मस्त होती. मून रूफ उघडून आकाशाकडे पहात, 'बोनोबो'ची गाणी ऐकत वेगाने जाण्यास मजा येत होती. बराच वेळ झाल्यानंतर त्याने एका स्टेडीयम समोर गाडी थांबविली. मला काही कळेना. मग त्याने सांगितले. मी त्याच्याकडे कधीकाळी बोललो होतो, बेसबॉलच्या मॅचबद्द्ल. अमेरिकेत जवळजवळ सार्‍यांनाच बेसबॉलचं वेड आहे. स्टीवने आमच्यासाठी त्याचे पासेस घेऊन ठेवले होते. मॅच होती ह्यूस्टन आणि शिकागो यांच्यामधील. ते प्रशस्त स्टेडीअम पाहून मी चक्रावून गेलो होतो. स्टेडीअमवर बसून लाइव मॅच पहाण्याचा माझा तो पहिला प्रसंग. मॅचनंतर तो आम्हाला "Tea and Tapioca" मध्ये घेऊन गेला. तिथे मी cold coconut tea प्यायलो. माझी एकच चुक झाली म्हणजे मी large tapioka मागितलं. त्याचे दाणे फुलून इतके मोठे झाले के पुढे पिता येईना. आता पुढील वेळेस लक्षात ठेवीन. एक दिवस स्टीव आम्हाला Thor 3D बघण्यासाठी घेऊन गेला. First day first show असूनही गर्दी फार दिसत नव्हती. ते सारं बघून मला काहीसं अजब वाटलं. टिकेटींग मशीनसमोर आम्ही उभे राहीलो आणि टिकेट्स काढली. ना धक्काबुक्की, ना त्रास. पुन्हा आपल्याला हवे त्या ठिकाणी बसायचे. सीट नंबर पद्धत नाही. पण सारं सुरळीत. आवाज नाही, गोंधळ नाही. Thor 3D हा एक वेगळाच अनुभव होता.

मी आणि स्टीव

ह्यूस्टन आणि शिकागो मधील बेसबॉल मॅच

'नासा'

नासा- माझी अमेरिकेतील शेवटची संध्याकाळ - पार थकलो होतो

मुळात ज्या कामासाठी गेलो होतो ते काम यशस्वी झालं हे सगळ्यात महत्वाचं. पण शेवटच्या क्षणापर्यंत इतकं काम होतं की शेवटी मला ऑफिसमधूनच तडक विमानतळावर जावं लागलं. किमान ४ तास आधी विमानतळावर पोचणं गरजेचं असूनही मी संध्याकाळी ५:०० पर्यंत ऑफिसमध्येच होतो, रात्री ८:३० ची फ्लाइट. मग मात्र किंचित धाकधुक वाटायला लागली. शेवटी सार्‍यांचा निरोप घेऊन मी टॅक्सीत बसलो. माझ्या बॅग्स उचलून शिवम आणि स्टीव दोघेही मला बाहेर पोचविण्यासाठी आले होते. टॅक्सीत मी बसेपर्यंत दोघेही तसेच उभे होते. शिवमबरोबर एक शेवटची सिगारेट मारली आणि त्या दोघांना जड मनानी परतीचा हात केला. टॅक्सीचं दार बंद झालं आणि क्षणभर मनात विचार येऊन गेला, "च्यायला, काय जिंदगी आहे! कुठे जिवाभावाचं कोण भेटेल काही सांगता येत नाही. सारी भूमी खरतरं अखंड आहे, मग सीमारेषा आपणच का आखल्यात?" ह्म्म्म्म....


माझी कंपनी - शेवटचा दिवस

निघालो तो नेमका हेवी ट्रॅफिकच्या वेळेस. कॅब ड्रायवरला मी माझ्या फ्लाइटची वेळ सांगितल्यावर तो ही क्षणभर चरकला असावा. काहीतरी मनात योजल्यासारखा वार्‍याच्या वेगाने निघाला आणि कुठल्यातरी निराळ्याच रस्त्यावरून जाऊ लागला. आता क्षणभर मी चरकलो. काही बोलणार एवढ्यात मला त्याच्या पुढील सीटवर ठेवलेलं बायबल दिसलं. "अरे, हा अध्यात्मिक दिसतोय" अशी मनाची समजूत करून घेत मी नि:संशय डोळे मिटले. सकाळपासून चालू असलेल्या धावपळीमुळे कधी झोप लागली हे कळलं नाही पण बरोबर त्यानंतर अर्धा तासात मी एअरपोर्टवर होतो हे खरं. पटापट बॅग्स उचलल्या आणि चेक-इन साठी निघालो. १५ तासांचा ह्यूस्टन ते दोहा प्रवास अतिशय छान झाला. मी जाण्याआधी मला कतार एअरलाइन्स दिल्याबद्द्ल मी कुरबुर केली होती. तेव्हा माझ्या ट्रॅवलडेस्क मधल्या मित्राने मला ही ५ स्टार एअरलाइन आहे असं सांगितलं होतं. अर्थातच मी त्यावर फार विश्वास ठेवला नव्हता. मुंबई-दोहा विमानप्रवास खत्रुड झाला. मी ब्लॅंकेट मागितल्यावर ब्लॅंकेटस संपली आहेत असं मला सांगण्यात आलं होतं. पुन्हा माणसं सगळीचं अद्वितीय. माझ्या बाजूच्या माणसाचा इमिग्रेशन फॉर्म मी भरून दिला. एअरहोस्टेस गोळ्या घेऊन आली, तर बचका भरून गोळ्या घेणारे असंख्य महाभाग. असो... यावर अधिक भाष्य नको.

तर सांगायचा मुद्दा मुंबई-दोहा विमानप्रवास खास झाला नाही. मी माझ्या अविश्वासावर ठाम होतो. मी जिंकलो असं वाटत असतांनाच मी दोहा-ह्यूस्टन फ्लाइटमध्ये पाय ठेवला आणि सारं चित्रच पालटलं.


ह्यूस्टन - दोहा प्रवासासाठी सज्ज होत असलेलं माझं फ्लाइट

एखाद्या ५-स्टार सारखी सरबराई बघून मी गोंधळलो. गेल्यागेल्या हॉट टॉवेल, गोळ्या, फ्रेशनेस नॅपकीन्स, ब्लॅंकेट्स, इअर फोन्स, वेलकम ड्रींक कशाची म्हणून ददात नव्हती. पुन्हा फ्लीट अगदी नवीन आहे हे जाणवत होतं. टीवी वर २०० च्या वर चॅनेल्स. असंख्य गाणी. ४०००० फूट उंचीवर, गरम कॉफीचा कप हातात असतांना, बडे गुलाम अली खॉं साहेबांचा 'कोमल रिषभ आसावरी' ऐकणं हे काय सुख आहे ते मला विचारा. थोडक्यात, कतार एअरलाइन्स खरोखरच चांगली आहे यावर माझा विश्वास बसला. पण पुन्हा परतीच्या प्रवासात दोहा-मुंबईची एअरलाइन फ्लीट पाहून यावेळेस थोडं वाईट वाटलं. हा भेद का? प्रश्न मनात असंख्य वेळा डोकावून गेला. उत्तर मात्र मिळालं नाही. मुंबईला पोचल्यावरची कहाणी सुरुवातीलाच सांगितली आहे. एअरपोर्टवर योग्य जागी पार्किंग केल्याची शिक्षा म्हणून २५० रुपये पार्कींग फी भरली आणि पुण्याच्या दिशेने निघालो.

सांगण्यासारखं अजून खूप आहे. पण काही नाती, गोष्टी, प्रसंग शब्दातीत असतात. त्यांना मनात जपावं हेच खरं. दिवस पाखरासारखे भुरर्र उडून गेले होते. आता पुन्हा ट्रॅफीक, धूळ, रस्त्यावर बिनधास्तपणे थुंकणारे थुंकसंप्रदायी, तीच घालमेल हे सारं डोळ्यांपुढे नाचू लागलं होतं. पण त्याच बरोबरीने या काहीशा कुरूप वास्तवतेला सुंदर करणारी आणि डोळ्यांपुढील अंधारात मिणमिणत असणारी कधीकाळी वाचलेली कुसुमाग्रजांची कविता मनात पिंगा घालत होती.

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध!

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट!

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग!

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!

ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!

तुमचा,
केदार