Saturday, December 31, 2011
नववर्षाच्या शुभेच्छा!
Thursday, December 22, 2011
माणुसपण देगा देवा, नाही देवत्वाचा हेवा!
देव म्हणजे काय याचं उत्तर मोठमोठे गणिती, शास्त्रज्ञ अजून देऊ शकले नाहीत. याचा अर्थ देव नाही असा काढायचा का? छे छे... माझ्या मते देव आहे... नक्की आहे... पण तो दयाळु आहे... कनवाळु आहे... एखादा मनुष्य २० किलोमीटर प्रवास करून भुकेला आपल्या दर्शनाला किंवा पुजनाला आला आहे, मग भले तो येतांना दोन फुलं कमी का घेऊन येईनात, त्याचा चेहरा उतरलेला का असेनात, त्याची दाढी वाढलेली का असेनात... तो माझा आहे असाच विचार देवाच्या मनात येत असावा. पण अध्यात्माचं थोतांडं माजवणारे काय काहीही बोलतात. त्याचा विचार मी कुठपर्यंत करावा? मनात भिती असावीच पण भयगंड नसावा हे नक्की. भिती आपल्याला चुकीचं पाऊल उचलण्यापासून परावृत्त करेल पण भयगंड आपल्याला पाऊलंच उचलु देणार नाही, मग आपल्या मनुष्यपणाचं काय करायचं? माणसाचा गुणधर्म चुका करणं, त्यातून शिकणं. हा गुणधर्म जर देवानीच माणसात घातला असेल तर तोच देव हातून चुकुन झालेल्या चुकांसाठी माणसाला शिक्षा करेल ह्यावर माझा तरी नाही बुवा विश्वास बसत.
देव निळ्याशार आकाशासारखा निरामय असेल, भरून आलेल्या काळ्या आभाळासारखा गुरगुरत अंगावर येईल असं मला तरी वाटत नाही. देव पाण्याच्या संततधार नैसर्गिक प्रपातासारखा एकसंध आणि शुद्ध असेल, तो साठुन राहिलेल्या डबक्यासारखा कळकट्ट आणि संकुचित नक्कीच नसेल. देव समईच्या ज्योतीप्रमाणे शीतल असेल, तो भसाभ्भस तेज अंगावर फेकून आपलं देवपण सिद्ध करणारा असेल असं मला वाटत नाही. आपलं बाळ आपल्यापाशी आलंय, ते थकलंय, त्याच्या हातून आपल्यासाठी होत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याबद्द्ल त्याला खरी आत्मीयता आहे म्हणून होत आहे हे देवाला कळत नसेल? कोण आई दमून आलेल्या मुलाला किंवा मुलीला पाय चेपण्यासाठी तासनतास राबवून घेईल? माझ्या तरी पहाण्यात अशी आई आजवर आलेली नाही. मग 'माऊली' असं बेंबीच्या देठापासून केकाटायचं आणि त्याच 'माऊली'ला घाबरून बिचकुन रहायचं यात कितपत तथ्य आहे? बहूतेक अशी माणसं अर्धवट तरी असतात किंवा अतिशहाणी तरी यावर माझा ठाम विश्वास बसत चालला आहे. संताघरचं अन्न मिळणार म्हणून ही माणसं काहीही करतील, पण अंगात खरखुर संतंपण भिनावं यासाठी ही माणसं काय विशेष करतात? अरे बेट्यांनो, प्रसाद खाऊनच जर सुख मिळणार असेल तर मग प्रसादासाठी दर दिवशी रांगेत उभे रहाणारे भिकारी आज एकावेळच्या अन्नापासून वंचित का रहातात? हा साला सगळा स्वार्थ आहे. यात शुद्ध भावना किती आणि वासना किती हे त्यांचं त्यांनाच माहीत. आणि अगदी खरी भावना असली तरीही जोवर देवाधर्माच्या या बाजारात त्यांच्यासारख्यांनी निर्माण केलेल्या दिखाऊ संकल्पना आहेत तोवर देवाबद्द्लचा भयगंड माणसाच्या मनात तसाच राहील आणि कालांतराने तिथे अंधश्रद्धा तरी निर्माण होईल किंवा अनास्था तरी!
माणसातलं माणुसपण मेलं की त्याच्यातला देवही मरतो असं मला वाटतं आणि म्हणुनच देव आपल्यासोबत असावा असं वाटत असेल तर माणुसपण जपणं हा इतकाच सोपा उपाय रामबाण आहे. बाकी हे झाले माझे विचार... थोडे जहाल असतीलही...पण ज्या देवाने मला निर्माण केलं त्याच्याविषयी आणि मला जसं निर्माण केलं त्याबाबतीत कृतज्ञ रहाण्याचं सोडून त्यानी माझ्यात ओतलेल्या जिवंत माणुसपणाशी प्रतारणा करण्याचा मुर्खपणा मी आजवर करत आलो. आता बास! अध्यात्मात उंचावर पोचणं यापेक्षाही उंची गाठणं जास्त महत्वाचं आणि उंची गाठायचीच असेल तर देवाधर्माबद्द्लचा डोळस दृष्टीकोन अंगिकारणं याला पर्याय नाही. शेवटी...
जेथे जातो तेथे तो माझा सांगाती ।
चालविलं हाती धरोनिया ।।
तुमचा(काहीसा उद्विग्न),
केदार
Monday, December 19, 2011
आज संध्याकाळी...
Friday, November 11, 2011
'शलाका'
Thursday, November 3, 2011
स्वत:ला माफ केलं पाहीजे
Friday, October 28, 2011
धुकं!
Wednesday, October 26, 2011
दिवाळी म्हणजे...
Wednesday, October 19, 2011
घुसमट किंवा तत्सम काहीतरी...
तुमचा (पराकोटीचा अस्वस्थ),
केदार
Friday, October 7, 2011
कोसला
ती अतिशय शांत होती. कामात, बोलण्याचालण्यात, गाणं म्हणण्यात, शाळेत जाण्यात.
आई म्हणायची, हिला मेंदूच नाही. कंदिलाची काच मोरीत दुसरं कुणीही घासत असतांना फुटली की आई म्हणायची, मन्ये, थांब कारटे. मग मनी घरातून म्हणायची, मी नाही ग आई. मी झाडते आहे. कुणी दुधाचं भांडं आडवं केलं की आई घरातून म्हणायची, मनीच असणार.
दर वेळी मुलगीच होते, म्हणून आजी नेमकी मनीच्या वेळी बाळंतपणाला कंटाळली. घरातले सगळे व्याप सांभाळून पुन्हा आईचं करायचं. ती तान्ह्या मनीचं अंग घसघसून घासायची. एकदा कडक पाण्यात थंड पाणी मिसळायचं विसरूनच तिला पायांवर पालथं घेऊन पाण्याचा चटका लागल्यावर आजी म्हणाली, आता कोण हिला परत पाळण्यात टाकेल, गार पाणी मिसळून पुन्हा घरातून हिला आणून पायावर घेईल? मग मनी किंकाळून रडली, तेव्हा आई घरातून आली. आणि पाण्यात हात घातल्यावर रडून म्हणाली, उठा मी धुते. तेव्हा आजी मनीला जमिनीवर आपटून म्हणाली, मुलींच्या आईनं एवढी मिजास करू नये.
पण आईचंसुद्धा मनीवर फार प्रेम नव्हतं. ती पोटांत असताना आईला पण वाटायचं, इजा बिजा तिजा. हा तिसरा मुलगाच होईल. पण झाली मनी. म्हणून वडलांचीसुद्धा हिच्यावर तिरपी नजर होती.
...
मनीच्या अंगावरचे फोड लिंबाएवढे झाले. आजी हिसपिस करत तिची व्यवस्था पाह्यची. आई छोट्या नलीकरता मनीच्या फार जवळ जायची नाही. दुरून पाह्यची. मनी आईला पाहून, मला घे म्हणून दोन्ही हात वर करायची. पण आई घ्यायची नाही.
फोड टरारले तेव्हा मात्र आई मनीच्या खाटेजवळ फक्त बसायला लागली. घराच्या कुणालाच तिथे येऊ देत नव्हते. फोड खाजवू नये म्हणून मनीच्या दोन्ही हातांत लहानलहान लांब पिशव्या अडकवून त्या मनगटांवर गच्च बांधून टाकल्या होत्या. पिशव्यांतून देखील ती फोड खाजवून फोडायची. म्हणून तिचे दोन्ही खांदे रक्तबंबाळ झाले होते. मग आजीने संतापून तिचे हात खाटेच्या दोन्ही बाजूंना करकचून बांधून ठेवले.
मग ती हात सोडा म्हणाली.
तेव्हा आईनं एकदा विचारलं, मनूताई, तुला काय हवं? पाणी?
तेव्हा मनी बोललीच नाही.
आई म्हणाली, मने बोल, बोल. उद्या तुला बोलता येणार नाही. आज माझ्याशी बोल.
पण ती आईशी बोललीच नाही.
आजी म्हणाली, मनूताई, दादाला तिकडून काय आणायला सांगू?
तेव्हा ती म्हणाली, लाल साडी.
लाल साडी.
हे ती म्हणाली, तेव्हा नेमकं त्या वेळी मी इकडे काय करत असेन? खोलीत होतो की टेकडीवर? की मित्रांबरोबर हसत होतो,की खिडकीतून टेकडीकडे पहात होतो?
तिला मी आठवलो असेन. लाल साडी.
हे ती मला दर सुट्टीत सांगायची. आणि मी दर वेळी म्हणायचो, पुढच्या वेळी नक्की.
मग मी साडी आणणार म्हणून ती माझी किती तरी कामं करायची. माझी पाठ खाजवून दिली नाही की मी म्हणायचो, लाल साडी हवी ना?
हळूहळू तिचा आवाज बंद होत आला. घशात पण फोडफोड असतील. डोळ्यांत तर फोड पडून बाहुल्या पांढर्या झाल्याच होत्या.
आई म्हणाली, मनूताई तुला काय हवंऽय?
मनी म्हणाली, माझे हात सोडा. आग, आग, आई, आग गं.
मग तिचं तोंडच उघडेना. तोंडात ओतलेलं आत जाईना. डोळे तर गेलेच होते.
आई खाटेच्या तिकडच्या बाजूनं हाक मारायची, मनूऽ
आणि ती दोन्ही हात ख्रिस्तासारखे बांधलेले ठेवून पांढरे डोळे ताणताणून नेमकी तिकडे पाह्यची.
मग आई उशामागून हाक मारायची, मनूताईऽ.
तेव्हा ती डोकं वर करून पाह्यची.
डोळे होते कवड्यांच्यासारखे शुभ्र.
आजी म्हणाली, अजून ऐकू येतंय.
आणि दोन दिवसांनी तिला न न्हाणता-धुता गावाबाहेर पुरून आले. आणि तिच्याबरोबर तिच्या खाटेला लागलेलं सगळं पुरून आले. तिची शाळेत जायची छोटी पिशवी, तिची चादर - सगळं.
मग दोन-तीन दिवस मी संतापून गेलो. पण कशावर संतापावं हे कळेना. कशावर?
मी म्हणालो, मी वडलांचा खून करीन. मी आजीला ठार मारीन. मग मी सगळं घर पेटवून देईन. सगळ्यांची प्रेतं त्या घरात जाळून टाकीन, आईला जिवंत. हे असं मरणं.
मनीला पुरलं पुरलं पुरलं. मी भावनांनी खरोखरच भडकून गेलो. बंडल नाही.
मी एक पिवळीजर्द लहान मुलींची साडी विकत आणली. आणि तिचे बोटबोट तुकडे केले. ते पेटवून दिले. त्या जाळात माझे हात भाजले. मग दौत जमिनीवर ओतून माझ्या हातांचे चटके थंड केले. शाईनं तळवे भिजवून भिजवून सगळीकडे माझ्या हातांचे शिक्के मारले. उशीवर, गादीवर, टेबलावर, वह्यांवर, पुस्तकांवर, दारावर, खिडक्यांवर, भिंतीवर.
मग पातेल्यातलं सगळं दूध खाली एका कुत्र्याच्या बेवारशी पिल्लाला पाजलं.
मी म्हणालो, मी याचा सूड उगवीन. दर महिन्याला शंभर रुपये खर्चीन. महिन्याला दोनशे रुपये मागवीन.
मी एकटा वेताळ टेकडीवर निघून आलो. केव्हा वेड्यासारखा धावत सुटलो. केव्हा नुसता बसून राहिलो. रात्री पुण्यातले अनेक रस्ते पायी हिंडलो. एका पोलिसानं हटकलं तेव्हा मी म्हणालो, माझी बहीण मेली.
...
आणि मी म्हणत होतो, धर्माचं होतं-नव्हतं तेवढं गाठोडं बांधून ती निघून गेली. निघण्यापूर्वीच्या वेदना आमच्या स्मरणासाठी ठेवून देऊन. तिनं एवढंच तोडलं नाही - जे तिच्याआमच्यात कायम राहील. बाकीचं सगळं - सगळ्या जमिनीवरच्या रेघा पुसून टाकल्या. ती नुकतीच नेमानं शाळेत जात होती. घरून सात वाजायच्या आतच तिला ढकलून द्यायचे. ती नुकतीच बाराखडी शिकली होती. आणि तिला फक्त शिकवलेलेच धडे वाचता यायचे. तेव्हा भिंतीवर तेवढीच अक्षरं तिला दिसली असतील. खिशात सागरगोट्या होत्या. फ्रॉकचं कापड अंगाला चिकटलं होतं. हे सगळंच टाकलं. ती सर्वत्यक्त काळोख्या लांब रात्रीची वाट चालत असेल आता. जेव्हा मीही त्या वाटेवर जाईन, तेव्हा ती किती तरी पुढे गेलेली असेल. म्हणजे सापडणारच नाही. गेलं ते गेलं, आता नवं काही - असं म्हणून. तिच्याबरोबरच तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली. आणि तिला हेही काहीच नाही. तिला कसलाच पार नाही. तीर नाही. किनारा आहे, जो फक्त एकदाच गाठता येईल. तिनं धर्म तरी काय बरोबर नेला असेल? तिनं येतांना फक्त कर्म आणलं. जातांना फक्त काळोखा प्रवास.
...
तिचा प्रवास तिचाच. ती सर्वमुक्त. हेमुक्त तेमुक्त. रंगमुक्त. अंगमुक्त. मनमुक्त. संज्ञामुक्त. ती मुक्तिमुक्त. तिचं पुसट मनोबिंब फक्त माझ्याजवळ.
...
कादंबरी - कोसला
लेखक - भालचंद्र नेमाडे
Thursday, July 7, 2011
आंबोली...स्वप्नातलं गावं!
ग्रीन वॅली रेसॉर्ट
हळूहळू संध्याकाळ होत चालली. जंगलातील आवाज गडद होत गेले. धुकं गडद होत गेलं. समोरच्या हॉटेलमधील गॅलरीत टांगलेला केशरी कंदील धुक्याच्या आड गेला. आपलं क्षीण अस्तित्व दर्शवू लागला. जोराच्या वार्याबरोबर धुकं काहीसं फिस्कटलं की एक फिक्कट केशरी लकेर उमटे. पुन्हा सारं धुकंमय! थोड्या वेळाने आम्ही जेवणासाठी उठलो. आंबोली सिंधुदूर्ग जिल्ह्यात येतं. Authentic मालवणी खाण्यास मिळेलं या आशेने मी मालवणी चिकन मागविले. सुरमईचा एक तुकडा मागविला. पण जेवण खास नव्हतं. थोडी निराशा झाली. सोलकढी मात्र उत्तम होती. शतपावली करून आम्ही झोपण्यास रूमवर परत आलो. खरतर इतकं ड्रायविंग झाल्यामुळे झोप यायला हवी होती. पण थकवा कुठल्या कुठे दूर पळून गेला होता. बराच वेळ झोप लागली नाही. काही काळानी डोळे मिटले आणि जाग आली तेव्हा चहाचा घमघमाट रूममध्ये पसरत होता. मसाला चहा.... अहा.......
मोती तलाव
तिसरा दिवस उजाडला सोनपावलांनी! धुकं गायब झालेलं होतं. उरला होता तलम सोनेरी सूर्यप्रकाश. काल रात्री भरपूर पाऊस पडून गेलेला. वातावरण थंड. त्यात कोवळी उन्हं. मस्त होतं यार! एकदम मस्त! अन्हिकं आटोपून बाहेर पडलो. आज आंबोलीतील स्थळं (लग्नाची नव्हे) पहाण्याचा बेत होता. हॉटेलमधील वर्कर भिकाजी मातोंडकर गाईड म्हणून सज्ज झाला. कोवळ्या उन्हात टोपी वगैरे चढवून थाटात आम्हाला बोलवायला आला. आम्ही तयार होतोच. मग आधी कुठे ब्रेकफास्ट करायचा हा प्रश्न? मला या प्रश्नांची कधी कधी तिडीक येते. साग्रसंगीत ब्रेकफास्ट केलाच पाहीजे का? कधी तरी नाही केला तर काय बिघडलं? रस्त्यात थांबून कुठेतरी वडापाव वगैरे घ्यायचा आणि गाडी चालू असतांना खायचा यात मजा आहे. वेळही वाचत नाही का? मग शेवटी लोकाग्रहास्तव आंबोलीत कामत रेस्तरॉं आहे तिथे गेलो. कडक डोसा आणि फिल्टर कॉफी छान होती. तिथून आमची सफारी निघाली. मातोंडकर रंगात येऊन सगळं सांगत होता.
प्रथम हिरण्यकेशी नदीचा उगम पहाण्यास गेलो. फार रमणीय जागा आहे. गाडी बरीच दूर उभी करावी लागते. तिथून जाण्यासाठी छोटीशी पायवाट आहे. नदीवर बांधलेला पूल आहे.
हिरण्यकेशीवरील पूल
हिरण्यकेशी देवस्थान
Friday, June 24, 2011
प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे
असो. तर गाडीवर टांग टाकली आणि तुळशी बागेत पोहोचलो. (पुण्यात आम्ही दुचाकी, चारचाकी सार्यालाच 'गाडी' असं संबोधतो.) दिवे गेलेले होते त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात सारे व्यवहार चालू होते. खुद्द राममंदिरात सुद्धा दिवे नव्हते. मनाला थोडासा आनंद झाला. सगळीकडे अंधार असतांना, फक्त एका समईच्या प्रकाशात देवाचा गाभारा, मूर्ती अद्वितीय दिसते. रामाचं, दास मारूतीचं दर्शन घेतलं, थोडा वेळ सभामंडपात विसावलो आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी पुढे झालो. तुळशी बागेतील राममंदिरातील प्रदक्षिणा मार्गाच्या अगदी सुरूवातीस, वर भिंतीवर स्वामी रामकृष्ण परमहंसांचं एक विधान लिहिलेलं आहे. ते मी आजवर असंख्य वेळा वाचलेलं आहे पण जेव्हा कधी मी ते पुन्हा वाचतो तेव्हा तेव्हा तोच आनंद, उत्साह, औत्सुक्य आणि उर्मी अनुभवतो. ईश्वराच्या जवळ जाण्याविषयी, साधनेविषयी त्यात काही अभूतपूर्व असं लिहिलेलं आहे. तो एक गुरूमंत्रच आहे, सोप्या शब्दात मांडलेला!
"केदार, परमेश्वर प्राप्तीचा अर्थ शोधायचा म्हणजे काय? तो आपल्यातच लपलेला, रुजलेला आहे. त्याची रूपं असंख्य आहेत. त्यामुळे एखादी सुंदर गोष्ट पहाशील, अनुभवशील त्यावेळेस तिथे परमेश्वर आहे असं समजण्यात काहीच वावगं नाही. आज तू रियाज केलास. गंधार लावलास. त्या गंधारातून जे सौंदर्य, जो आनंद निर्माण झाला त्यात परमेश्वर आहे हे विसरू नकोस. परमेश्वर असाच कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देत असतो."
सगळीकडे frequency आहे. ती जिथे match होते तिथे सूर उमटतात, जिथे होत नाही तिथे असूर उपटतात. स्वामी रामकृष्ण परमहंसाचं ते विधान मी याच दृष्टीने बघतो. ईश्वरप्राप्तीचा अर्थ शंखचक्रगदाधारी प्रकटणं हा नव्हे, छोट्या छोट्या गोष्टीत ईश्वराचा सहवास अनुभवणं आणि त्यावर unbiased विश्वास ठेवणं हा आहे. पुन्हा साधनेला समर्थपण येण्यासाठी सातत्याची जोड हवीच आणि नेमकं हेच त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. एरवी जबाबदार्यांच्या ओझ्याखाली दबून गेलेला आणि संसार, कामकाज यात स्वत्व हरवून गेलेला मनुष्य एखाद्या स्वत:ला हव्या असलेल्या पण हरवून गेलेल्या मार्गावर चालण्यासाठी पुन्हा पुन्हा सज्ज होतो यालाही सातत्यच म्हणायचे ना? माझ्या प्रत्येक भेटीत तुळशीबागेतील राममंदिरात जतन करून ठेवलेलं हे विचारधन माझ्या मनावर आनंदघन म्हणून बरसतं आणि मला सातत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करतं. स्वामी परमहंस म्हणतात...
"अथांग महासागरात मौल्यवान मोती वैपुल्याने मिळतील, परंतु ते मिळविण्याकरता तुला अचाट साहस लागेल. जरी तुला काही वेळा अपयश आले तरी सागरात मोती नाहीतच असे म्हणता येणार नाही. सातत्याने न खचता प्रयत्नशील राहिलास तर यश खात्रीने तुझेच आहे.
त्यापेक्षाही कष्टतर अनुभव मानवास ईश्वर साधनेबद्द्ल प्रत्ययास येईल. वैफल्याने खचून न जाता तू अविश्रांत प्रयत्नशील राहिलास तर मी विश्वासपूर्वक सांगतो की ईश्वर तुझ्या जवळच येईल.
प्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे.”
हाच लेख येथेही वाचता येईल.