Sunday, February 6, 2011

समाधि

अंधारात बसलो असता असंख्य चित्र उघडया डोळ्यांपुढे आपसूक तरळायला लागतात. आधी टिंब टिंब अशी नक्षी पुसटशी उमटते. मग ती टिंब जोडणारी एखादी रेषा....त्याच्या मागोमाग काही वेडीवाकडी वर्तूळं.... काही अर्धवट राहीलेले चौकोन.... मग एकदम एखादा प्रकाशाचा झोत.... सारं काही अंधारातच उगवतं आणि नाहीसं होतं. हरवलेपणाच्या पलीकडे जाऊनही हरवलेपणा उरतो. एक अशी स्थिती... जेव्हा मी निद्रेत नसतो आणि जागाही! दूरून येत असलेले आवाज, कोलाहल... सारं काही कानावर पडत असतं पण ते येतं तसचं परत फिरतं. आपला वेध घेत एखादा बाण सुस्साट सुटावा आणि तो वेध न घेताच परत फिरावा असं! कशाचाच संबंध रहात नाही.

कुठून बाळाची गोजीरवाणी पावलं ऐकू येतात. सोनसाखळ्या घातलेली.... पवित्र छोट्या छोट्या घंटिका.... नाजूक, निर्व्याज, मार्दव.... सखीचा हळवा स्पर्श.... तिच्या कुंतलांचा सुवास.... तिचं माझ्यात भिनणं.... आईची पूजा.... देवासमोर तेवत असलेलं निरांजन.... उदबत्तीचा गंध.... तिने केलेल्या अन्नाचा सात्विक, वेगळा वास... पाळण्यात मुठी करून झोपलेलं बाळं... त्याला निजवत असणारी माझी सखी... त्याच्यावर गोल गोल फिरत असलेलं रंगीत चिमणाळं.... सहज...अगदी सहज डोळे मिटतात. मी पुन्हा पुन्हा डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो. पण ते उघडत नाहीत. तशी आज्ञाच होत नाही. सगळीकडे आनंद.... देखणा आनंद.... आता काही काळ तरी मला त्या आनंदात समाधिस्थ राहू दे.

हातात पहार घेऊन उभे आहेत माझ्या जिवंत समाधिचे पहारेकरी... ती खणून काढण्यासाठी...

पण म्हणून काय मी समाधि लावूच नये....?

केदार केसकर

No comments: