Friday, November 11, 2011

'शलाका'

Photo of Engagement Proposal Sunrise on the Beach

माझी मैत्रिण माझ्याशी आज सहज बोलत असता तिच्या डोळ्यात अचानक साठुन आलेलं पाणी मी पाहीलं. तशी ती फार जुनी मैत्रिण आहे असंही नाही. पण तरीही तिला तिच्या दु:खाचं कारण विचारण्याचं स्वातंत्र्य मी आपणहून घेतलं. तिने सुद्धा मला मोकळेपणाने तिच्या मनातलं सांगायला सुरूवात केली.

"७-८ वर्षं लग्नासाठी मुलं बघतेय रे, पण अजून लग्न ठरतं नाही. वय वाढत चाललंय. प्रत्येक गोष्टी त्या त्या वयात व्हायला हव्या. वयाची पस्तिशी झाली. बहूतेक माझ्या नशीबात लग्न दिसत नाहीये".

मी या अनपेक्षित प्रसंगामुळे थोडासा गांगरूनच गेलो, खोटं कशाला बोला? शलाका अगदी उदास होऊन गेली होती, क्षीण झाली होती. तिच्यात तेजाचा अंश शिल्लक राहिला असावा असं वाटत नव्हतं. या सार्‍या वर्षात तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता यात शंका नाही. स्वाभिमानासोबतच रंगवलेली स्वप्न पटापट उलटणार्‍या वर्षांसोबत फिकट होत चालली होती. थोडावेळ शांततेत गेला अन् थोड्या वेळाने ती शांतताही बोचू लागली. मला बोलल्यावाचून करमेना. मी हळूहळू बोलण्यास सुरूवात केली.

"शलाका, लग्न ठरत नाही हे तुझं दु:ख एकवेळ मी समजू शकतो पण त्यासाठी आयुष्य आनंदाने जगण्याचं टाळणं हे कितपत योग्य वाटतं तुला?"

"नाही रे, एकटी मुलगी लग्नाशिवाय राहिली की समाज मागे बोलतो"

"समाज.................." मी किंचाळणारच होतो. (: "आता माझी सटकेल" असंच म्हणावसं वाटायला लागलं मला... :)

"समाज... समाजाची चिंता करायला, समाजानी तुझं काय केलंय? तुझं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी झालं असतं तर याच समाजानी बालविवाह केला म्हणून नावं ठेवली असती हे कळतंय का तुला? आपली पाठ फिरल्यावर आपल्याविषयी गैर बोलणार्‍या समाजाबद्दल मला काहीही सोयर-सुतक नाही आणि या असल्या कृतघ्न समाजाचं आपण देणं लागतो हे मला अजिबात मान्य नाही. समाजाचा विचार समाजाभिमुख लोकांनी करावा. आपण कुणासाठी जगणं शक्य झालं नाही तर स्वत:साठी तरी जगावं. You are just answerable to yourself. स्वत:ला आरशात पहातांना प्रसन्न वाटलं की आरसा पण हसतो. आरशाला कशाला कारणं द्यायची नावं ठेवायला? आणि कारण द्यायचीच कशासाठी? काय कमी आहे तुझ्यात? दिसायला छान आहेस, सुशिक्षित आहेस, सुसंस्कृत आहेस, मोठा पगार आहे, हुद्दा आहे, स्वत:ची गाडी आहे, फ्लॅट आहे. याचा माझ्यामते अर्थ तु यशस्वी आहेस असा नाही पण समाजाच्या दृष्टीने नक्कीच आहेस."

मी धडाधड बोलून गेलो.

बर्‍याच वेळाने शलाका थोडीशी हसली.

मला थोडं बरं वाटलं. ती हसली म्हणूनही आणि माझ्या भाषणाने मला स्वत:लाच जरा सकारात्मक वाटायला लागलं.

"The best way to cheer yourself up is to cheer someone else up" हे किती खरं आहे हे पटलं. मी पुढे बोलायला सुरूवात केली.

"पण हाच समाज तुझ्या या चांगल्या गुणांचं कौतुक न करता, तुझा ज्यात काहीही दोष नाही त्या गोष्टींवर ताशेरे ओढतो हे तुला पटतं?"

"नाही"

"नाही ना, म्हणून म्हणतो या चार भिंतीत अडकून पडू नकोस. ही चौकट सरड्यासारखी रंग बदलते. हिचं रुपांतर एकदम coffin मध्ये कधी होईल कळणारही नाही. "

तिला थोडंसं कळलेलं दिसलं. तिने डोळे पुसले. मी सिगारेट लाईट केली आणि पुढे बोलायला लागलो.

"आता राहीला प्रश्न वयाचा. त्याचा बोलबाला कशासाठी? मला माझी तिशी माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापेक्षा जास्त बरी वाटते. एक प्रकारची clarity आलेली असते या वयात. काय करावं याचं उत्तर मिळतच असं नाही, पण काय करू नये हे नक्की कळतं. आपण आपलं आयुष्य मस्त जगायचं. आपल्या स्वत:साठी जगायचं. दुसर्‍यांसाठी काही करायचं असेल तर त्याची सुरूवातसुद्धा स्वत:पासून करावी लागते. आपल्यातले गुण ओळखायचे. काहीही होवो आपला स्वत:चा effectiveness कमी होऊ द्यायचा नाही. तुझं दु:ख वय वाढत चाललयं हे नाही आहे. तुझं दु:ख वाढत्या वयासोबत आपण काही worthwhile करत नाही आहोत हे आहे. मला सांग, तुझ्या आयुष्याचं ध्येय काय?"

"आनंदी होणं" ती पटकन म्हणाली.

"मग फक्त तुझं लग्न झालं की तु आनंदी होशील, एरवी नाही?"

"तसं नाही. अरे पण वय वाढत चाललंय"

"तु जे सांगतेयस ते पटतयं मला आणि तुझं लग्न सुद्धा होईल लवकरच, पण तोपर्यंत स्वत:ला उत्तम मानसिक, शारीरिक, आर्थिक स्थितीत टिकवून ठेवण्याचं काम कोणाचं, तुझंच ना? ज्यावेळेस तो क्षण येईल त्यावेळेस त्याचं स्वागत करायला तु धड नकोस? आणि आयुष्याचा आनंद तुझ्यामते जर तारुण्यात आहे तर मग मला एक सांग,

शुभ्र, नीटस कपडे घालून एक प्रसन्न व्यक्ती आपल्या समोर उभी आहे...
अंतर्बाह्य शांत...
तिच्या केसांमधील विरळ चंदेरी बटा तिच्या आजवरील अनुभवांचे कथन करताहेत....
तिच्या डोळ्यात एक आत्मविश्वासपूर्ण अन् मार्दव सुहास्य आहे....
शरीराचा व्यास सुसंगत आहे...
लक्ष्मीचं, कलेचं, साधनेचं तेज तिच्या चेहर्‍यावर झळकतंय, याला तारुण्य म्हणत नाहीत?"

तिचे डोळे चमकले. मी ते पाहिलं. हे सगळं बोलून मला स्वत:लाच खूप शांत वाटायला लागलं. बहूतेक माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरं माझी मलाच मिळाली होती.

मी अजून बराच वेळ बोलत राहीलो असतो पण इतकं बोलून मी थांबलो. ती सुद्धा आधी पेक्षा बरीच शांत झालेली दिसत होती. दिवस संपला. कार काढली आणि घराकडे निघालो. रस्त्यात नेहमीप्रमाणे शनिवारात थांबलो चहा सिगरेटसाठी. एरवी जाणवणारा आजुबाजुचा प्रचंड कोलाहल शांत झाल्यासारखा वाटत होता. आपणं परिस्थितीपेक्षा मोठे झालो की असं घडतं हे मी कुठेतरी ऐकलं होतं.

ही तिची शांतता टिकेल, न टिकेल. मी पुन्हा या विषयावर काही बोलू शकेन न शकेन, पण एक मात्र नक्की...माझ्या प्रत्येक वाढदिवसाला "मी वयात आलो" हे असं म्हणण्याइतका नितळ दृष्टीकोन आणि निखळ मानसिकता मला लाभावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वत:चं स्वत:बरोबर असलेलं नातं दृढ करणं.

कुसुमाग्रजांनी कुठेशी लिहून ठेवलयं...

निराशेचा जरी अंधार हा असे
'मी'पणाचे नाते प्रकाशाशी...

माझे प्रयत्न चालू आहेत...आज फक्त झरोक्यावरची धूळ साफ केली आहे. उद्याच्या सुर्यासोबत त्यातून एखादी 'शलाका' येईल आणि ही चौकट तेजानी झळाळून उठेल...

विश्वास आहे.... मला विश्वास आहे...

तुमचा,
केदार

5 comments:

Pradnya said...

khup chan...

सौ गीतांजली शेलार said...

अप्रतिम ! एखाद्याला त्याच्याभोवतीच्या कुंपणातून मुक्त करणे म्हणजे त्याला स्वतंत्र करणे, ते तुम्ही केलंय!अभिनंदन!

Kedar said...

गीतांजली ताई, प्रज्ञा माझा उत्साह वाढविल्याबद्दल मनापासून धन्यवाद! पुन्हा जरूर भेट द्या.

लोभ असावा,
केदार

Shalaka said...

chan vatal vachun
jitak possible aahe dusaryach dukh kami karayach

Kedar said...

Ani tya barobarine swatahach suddhaa :)